#PunjabElectionResult: नवज्योतसिंग सिद्धूंनी मान्य केला पंजाबमधील पराभव; निकालांवर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!
नवी दिल्ली |
निवडणुकांच्या आधी जवळपास सहा महिने पंजाबमधील राजकारण काँग्रेसमधल्या अंतर्गत बंडाळीमुळे ढवळून निघालं होतं. नवज्योत सिंग सिद्धू यांची आक्रमक भूमिका, अमरिंदर सिंग यांचा राजीनामा आणि दुसऱ्या पक्षाची स्थापना, भाजपासोबत हातमिळवणी, चरणजीत सिंग चन्ना विरुद्ध सिद्धू असा थेट सामना यामुळे काँग्रेससमोर अनेक आव्हानं उभी राहिली होती. त्यामुळे काँग्रेससाठी पंजाब निवडणुकांचा पेपर कठीण ठरणार, अशी वर्तवण्यात आलेली शक्यता आता खरी ठरताना दिसू लागली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या मतदानासाठी आज मतमोजणी होत असून संध्याकाळपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्येच पंजाबमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट होऊन आम आदमी पक्षाकडे एकहाती सत्ता जाताना दिसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षाचा पराभव मान्य करत उलट आम आदमी पक्षाचं अभिनंदन केलं आहे.
The voice of the people is the voice of God …. Humbly accept the mandate of the people of Punjab …. Congratulations to Aap !!!
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) March 10, 2022
निवडणुकीच्या निकालांबाबत पहिली प्रतिक्रिया देताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्वीट केलं आहे. “लोकांचा आवाज हा थेट देवाचा आवाज असतो. पंजाबच्या लोकांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकार करतो. आम आदमी पक्षाचं अभिनंदन!” असं ट्वीट सिद्धू यांनी केलं आहे. गेल्या सहा महिन्यांत पंजाब काँग्रेसमध्ये आणि पर्यायाने पंजाबमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या. आणि या सगळ्या उलथापालथींच्या केंद्रस्थानी होते नवज्योतसिंग सिद्धू. सर्वप्रथम सिद्धू आणि तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामध्ये मतभेद झाले. हे मतभेद इतके टोकाला गेले की अमरिंदर सिंग यांनी सिद्धू आणि पक्षनेतृत्वावर टीका करत पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर सिद्धू यांचे नव्याने मुख्यमंत्री झालेल्या चरणजीत सिंग चन्नी यांच्यासोबत देखील मतभेद झाले. यावेळी पक्षनेतृत्वानं यशस्वीपणे मध्यस्थी करत हे मतभेद मिटवल्यामुळे सिद्धू नाराजी बाजूला सारून प्रचारात सहभागी झाले. मात्र, पक्षातल्या याच कोलाहलामुळे काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा फटका सहन करावा लागला असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.