WTC Final Day 1 : पावसाने केली निराशा, पहिले सत्र बीसीसीआयकडून रद्द
साऊथॅम्प्टन – 2019 साली झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ज्या न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला आणि करोडो भारतीयांना रडवलं त्या न्यूझीलंडशी आज जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पडणार आहे. त्यामुळे साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या क्रिकेट ग्राऊंडवर आज रंगणाऱ्या सामन्यात भारताला 2019च्या विश्वचषकाच्या पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी आहे. परंतु पावसाना दगा दिला आहे. पावसामुळे पहिलं सत्र रद्द करण्यात आलं आहे.
साऊथम्प्टनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार असला तरी साऊथम्प्टनमध्ये रात्रभर पाऊस पडत आहे. या कारणामुळे बीसीसीआयने पहिल्या सत्रात खेळ होणार नसल्याचे जाहीर केले आहे.भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकले आहेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २६ इतकी आहे.
2019च्या विश्वचषक स्पर्धेत शानदार प्रदर्शन करून भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये जागा मिळवली होती. त्यामुळे आता दोन सामने खेळायचे आणि आयसीसीच्या जगज्जेतेपदाच्या करंडक उंचवायचा हे स्वप्न विराट कोहलीने पाहिले होते. परंतु 9 जुलै 2019ला मॅंचेस्टर येथे विल्यमसनच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंडने सेमी फायनलच्या सामन्यात भारताचा धुव्वा उडवला. महेंद्रसिंग धोनीचा क्रिकेट कारकिर्दीतील हा शेवटचा सामना ठरला. धोनी यानंतर निळ्या जर्सीत खेळलेला दिसलाच नाही. शेवटी त्याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुड बाय केलं.