Women’s T20 World Cup 2020: पराभवानंतर १६ वर्षीय शफालीला अश्रू अनावर
टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव केला…या पराभवाने सर्वांनाचं दुख: झालं…पराभवानंतर शफाली वर्माला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. सलामीवीर एलिसा हेली आणि बेथ मूनी यांच्या फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १८४ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी म्हणावी तशी कामगिरी केली नाही. शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज या भरवशाच्या फलंदाजांनी दडपणाखाली अतिशय बेजबाबदार हवाई फटके खेळत आपल्या विकेट्स ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बहाल केल्या. या पराभवानंतर १६ वर्षीय शफाली वर्माला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
या आधीच्या प्रत्येक सामन्यात शफालीने धडाकेबाज कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. शफालीने पहिल्या सामन्यात २९, दुसऱ्या सामन्यात ३९, तिसऱ्या सामन्यात ४६ तर चौथ्या सामन्यात ४७ धावा केल्या. यात दोन सामन्यांमध्ये तिने सामनावीराचा किताब पटकावला. पण अंतिम सामन्यात मात्र ती ३ चेंडूत २ धावा करून बाद झाली. मेगन शूटच्या गोलंदाजीवर हेलीने तिचा झेल टिपत भारताला मोठा धक्का दिला. त्यामुळे पराभवानंतर तिने अश्रूंवाटे आपल्या भावनांना वाट करून दिली.