उद्योगांप्रमाणे NDTV मध्ये हस्तक्षेप करणार का?; गौतम अदानी म्हणाले..
संपादकीय स्वातंत्र्य कसं राखणार?
मुंबई : एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक प्रणय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी आरआरपीआरएचच्या प्रवर्तक पदाचा राजीनामा दिला. ‘एनडीटीव्ही’मध्ये मोठी गुंतवणूक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी केली आहे. अदानी समूहाने एनडीटीव्हीमध्ये आपली ६९ टक्क्यांहून अधिक भागीदारी केली आहे. याबाबत एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणव रॉय आणि राधिक रॉय यांनी माहिती दिली. पण, बाकी उद्योगांसारखं एनडीटीव्हीमध्ये हस्तक्षेप करणार का? संपादकीय स्वातंत्र्य कसं राखणार? यावर आता गौतम अदानी यांनी भाष्य केलं आहे.
NDTV हे विश्वसनीय, स्वतंत्र आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क राहील. एनडीटीव्ही स्वतंत्रपणे काम करत राहणार असल्याचं म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की व्यवस्थापन आणि संपादकीय यांच्यामध्ये नेहमीच एक लक्ष्मणरेषा असेल. थोड्या कालावधीत सर्व काही स्पष्ट होईल, असं गौतम अदानी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड मधून राजीनामा दिल्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये सुदीप्त भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल चेंगलवारायन यांची तात्काळ नियुक्ती करण्यात आली होती. RRPRH च्या मंडळावर नवीन संचालकांची निवड करण्यात आली होती.
एनडीटीव्हीमध्ये अनेक वर्षे पत्रकारिता करणारे रवीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा दिला होता. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रवीश कुमार यांना जेव्हा विचारण्यात आले की ते राजकारणात जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, मला राजकारणात ढकलण्याचे अनेक दिवसांपासून प्रयत्न होत आहेत, पण तरीही टीव्ही माझ्या मनात येत राहतो.