बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!
सांगली | इस्लामपूर येथील पंचायत समितीतील लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या पुतळयाचे अनावरण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी मुश्रीफांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा अनेक घडामोडी घडल्या. या सरकार स्थापनेत शिवसेनचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजावली. त्या घटनेचे वर्णन करताना मुश्रीफ म्हणाले, बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत’. मुश्रीफांनी यावेळी सादर केलेल्या चारोळीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, मला ग्रामविकास खाते मिळाल्यानंतर मी आर आर आबा आणि जयंतराव यांचा आदर्श ठेवून काम करत आहे. दुर्दैवाने कोरोना महामारी आली. राज्याचे मोठे नुकसान झाले असले तरी आपण येत्या काळात मोठे काम करू. शिवस्वराज्य दिन, स्मार्ट गाव हे चांगले निर्णय घेतले. भाजपा सरकारच्या काळात पंचायत समित्या बंद करण्याची वेळ आली; परंतु आपण निधी देऊन त्यांना स्थैर्य दिले. सात लाख घरांचे बांधकाम केले. उमेद जीवनज्योती अभियानाने महिलांना ऊर्जा दिली आहे. शेतकऱ्यांना पन्नास हजारांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, आमदार मानसिंग नाईक, अरुण लाड, सभापती शुभांगी पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवानेते प्रतीक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आबासाहेब पवार हे प्रमुख उपस्थित होते.