महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा
मुंबई : गेली काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यातच पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या काही भागासह मुंबईमध्ये २ ते ६ मे या दरम्यानच्या काळात हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान खात्याने आता राज्यातील पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार यासह सर्वत्र वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल असे सांगण्यात आले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातुरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील वर्तवला आहे. मुंबई आणि ठाण्यात देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.