T20 चे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीचा मोठा निर्णय
मुंबई – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टी ट्वेण्टीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून याबाबतची घोषणा केली. विराट कोहली केवळ टी ट्वेण्टीची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल. दोनच दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत.
सोशल मीडियावररील पोस्टवर तो म्हणाला की, मी तसा पुरेसा नशिबवान आहे की, मला फक्त भारताचं प्रतिनिधीत्वच करायला मिळालं असं नाही तर टीम इंडियाला पूर्ण क्षमतेसह लीडही करता आलं. भारताचा कर्णधार होण्यापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला सपोर्ट केला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. त्यांच्याशिवाय मला हे करता येणं शक्य नव्हतं. त्या प्रत्येकाचे म्हणजे टीममधले सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे कोचेस, तसच प्रत्यक भारतीय क्रिकेटप्रेमीचे ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली त्यांचेही आभार, असं कोहली कर्णधारपद सोडताना म्हणाला.
तो पुढे म्हणाला, वर्कलोड समजणं ही एक महत्वाची बाब आहे. गेल्या 8-9 वर्षापासून तीनही फॉरमॅटमध्ये खेळणं तसंच सातत्यानं 5-6 वर्षापासून कॅप्टन्सी करणं हा अती वर्कलोड आहे. याच पार्श्वभूमीवर मला आता असं वाटतं की टीम इंडियाला वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पूर्ण क्षमतेनं लीड करण्यासाठी मी स्वत:ला स्पेस देण गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मी टी-20 क्रिकेटला सर्व काही दिलंय आणि पुढेही बॅटसमन म्हणून देत राहील,” असंही कोहलीने म्हटलं आहे.
“अर्थातच, या निर्णयापर्यंत येण्यासाठी खूप वेळ घेतला. माझ्या जवळच्या लोकांशी यावर सविस्तर चर्चा केली. रवी भाई (रवी शास्त्री) आणि रोहित सुद्धा यांच्याशी बोललो. हे दोघेही नेतृत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्याशी बोलून मी दुबईत होत असलेल्या टी 20 विश्वचषकानंतर टी 20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मी बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही या विषयावर चर्चा केली,” असे कोहलीने स्पष्ट केले. तसेच यापुढेही मी माझ्या पूर्ण क्षमतेने भारतीय क्रिकेट आणि भारतीय टीमची सेवा करत राहीन, असे कोहलीने सांगितले.