भट्टीचे चटके सहन केल्याशिवाय मुले घडत नाहीत; विनायक भोंगाळे यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षण महोत्सव 2023 उत्साहात
बक्षीस वितरण समारंभ आणि गुणगौरव सोहळा संपन्न
पिंपरी : मुलांना कमी लेखू नका. त्यांना स्वत:च्या क्षमतेनुसार निर्णय घेऊ द्या. लोखंड भट्टीत टाकल्याशिवाय त्याला आकार व रूप येत नाही. त्याप्रमाणे जीवनरूपी भट्टीचे चटके सहन केल्याशिवाय मुले घडणार नाही. त्यांची निर्णय क्षमता वाढणार नाही. त्यांच्या निर्णयाचे स्वागत करा. त्यांच्या मार्गात अडथळा बनू नका, असे आवाहन गायत्री ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक विनायक भोंगाळे यांनी सोमवारी (दि.2) शिक्षकांना केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे चिंचवड येथील प्रतिभा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आयोजित शिक्षण महोत्सव 2023 मध्ये ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष विलास पाटील, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, शिक्षक तथा लेखक श्रीकांत चौगुले, प्राथमिक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे, अण्णासाहेब ओव्हाळ, अविनाश इंगवले, सुरेंद्र गायकवाड, संघटनेचे कार्याध्यक्ष मुक्तार शेख, सरचिटणीस अक्षय गोरे, कोषाध्यक्ष सविता माने, उपाध्यक्ष श्रीधर बाळसराफ, उपाध्यक्ष व कार्यकारी चिटणीस आप्पासाहेब पुजारी, विभागीय अध्यक्ष दयानंद यादव, राज्य संपर्कप्रमुख शंकर पवार, महिला आघाडी प्रमुख शोभा दहिफळे, खेड पतसंस्था सभापती अविनाश शिंदे, अभिजीत नाईकरे, मिलिंद फणसंडे, राजू लोंढे, दयानंद शिंदे, शंकर पवार आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात संघटनेच्या वतीने ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांना विनायक भोंगाळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
विनायक भोंगाळे म्हणाले की, अभ्यासक्रमात व्यापार, राष्ट्रीय उत्पन्न, शेअर मार्केट, जीडीपी असे व्यवहारिक शिक्षण दिले जात नाही. शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या बाहेरील शिक्षण विद्यार्थ्यांना आवर्जून द्या. त्यासाठी शिक्षकांनी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. अब्राहम लिंकन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गरीब कुटुंबात जन्माला आले. मात्र, ते आपल्या कर्तव्यावर मोठे झाले. बाळ हे विचाराचे पेशी आहे. ते पेशी पेरा. त्यावर संस्कार करा. त्यातून चांगले मुले घडणार आहे. ते कुटुंबाचे तसेच, देशाचे नाव उज्वल करतील, असे ते म्हणाले.
हेही वाचा – दिवाळीत मिळणाऱ्या आनंदाच्या शिध्यात आता आणखी दोन गोष्टींचा झाला समावेश
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष विलास पाटील म्हणाले की, संघटनेच्या वादात शिक्षकांनी पडू नये. केवळ अधिकार्यांवर टीका केल्याने संघटनाा वाढत नाही. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे प्रत्येक शिक्षकांची जबाबदारी आहे. महापालिकेत 50 लिपिक असून, शिक्षकांची कामे संथ गतीने होत आहेत. महापालिकेत शिक्षण विभाग प्रमुख म्हणून शिक्षण अधिकारी असावेत. अशैक्षणिक कामे शिक्षकांकडे दिली जाऊ नयेत.
महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे म्हणाले की, केवळ शिक्षकांच्या प्रश्नांसाठी भांडणारी ही शिक्षक संघटना नसून, शिक्षकांच्या सुप्त गुणांना वाव देणारी ही संघटना आहे. न भांडता शिक्षकांसाठी काम करणे ही बाब अभिमानास्पद आहे. शिक्षकांना विविध सर्वेक्षण करावे लागते. मात्र, शिक्षकांनी गुणवत्ता ढासळू दिली नाही. महापालिका व जिल्हा परिषद शाळेत शिकलेले अनेक जण मोठमोठ्या हुद्दयावर आहेत. आपल्या कामाद्वारे टीकेस उत्तर द्या. धन्वंतरी, अर्जित रजा हे प्रश्न सुटले आहेत. संचपुस्तिका, उदान, मुख्याध्यापाकांची पदोन्नती, आकृतीबंध आदी प्रश्न आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यात येत आहेत.
दत्तात्रय वारे म्हणाले की, शाळेचे प्रवेशद्वार हे जादूनगरी वाटली पाहिजे. शाळेच्या आता आल्यानंतर विद्यार्थ्यांबाबत श्रीमंत व गरीब असा भेद नाही वाटला पाहिजे. जागा, प्लॅट, सोने नाणे, पैसा महत्वाचा नाही तर, विद्यार्थी मोलाचे आहेत. समाजाच्या पाठींब्यामुळे खूप काही करता आले. काम केल्याने समाजाच्या प्रेमास पात्र ठरलो आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या कार्यक्रमास शिक्षकांची उपस्थिती लाभली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष विलास पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणेश लिंगडे यांनी सुत्रसंचालन केले. जालिंदर राऊत आभार मानले.