‘कोण सत्तेसाठी गेला की विकासासाठी याचे आमच्याकडे पुरावे’; काँग्रेस नेत्याचं अजित पवारांना प्रत्युत्तर
मुंबई : अजित पवार यांनी कोल्हापूर येथे सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांचं सरकार (महाविकास आघाडी) ज्या दिवशी पडत होतं, त्याच वेळी महायुतीत सामील व्हा. हे खोटं असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन. कुणाची तयारी आहे का? आणि हे खरे असेल तर मग जे लोक खोटं बोलत आहेत त्यांनी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, अजित पवार यांच्या या विधानावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, कोणी काहीही म्हणू देत, कितीही इमानदारीची भाषा करू देत. आमच्याकडेही पुरावे आहेत. कोण कशासाठी गेलाय? कोण सत्तेसाठी गेलाय? कोण सेवेसाठी गेलाय? कोण विकासासाठी गेलाय आणि कोण संस्थांच्या (ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स) दबावात गेलाय? आमच्याकडे याचे सगळे पुरावे आहेत. योग्य वेळी, आवश्यकता असेल तेव्हा सगळ्या गोष्टी, कोर्टाच्या आदेशापासून सगळं उघड करू. त्यामुळे विरोधकांना तुम्ही जी धमकी देताय, इशारे देताय, ते सहन करण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी आम्ही नाही.
हेही वाचा – सीबीएसईने २०२४ ला होणाऱ्या दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले
तुम्ही ज्या पद्धतीने पक्ष सोडून तिकडे गेलात, ते कशासाठी गेलात हे जनतेला माहिती आहे. तुम्ही किती पापं लपवली तरी कशामुळे गेलात हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अनेक जण आमची बदनामी करतात. आम्ही महायुतीत सामील झालो म्हणून टीका करतात. आमच्यावर दबाव होता म्हणून आम्ही सत्तेत सामील झालो असा दावा करतात. आमच्यावर लोकांची कामं करण्याचा दबाव होता म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत. संधी मिळाल्यावर लोकांची कामं केली पाहिजेत, असं अजित पवार म्हणाले.