“बारामतीत फक्त पवारांसह २० लोकांचा विकास झाला”; शिंदे गटातील नेत्याची टीका
बारामती लोकसभेचे नाव पुणे दक्षिण विभाग मतदार संघ असे करावे
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघात फक्त वरिष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बरोबर आणखी 20 लोक यांचाच विकास झाला. दुसऱ्यांचा विकास झालेला नाही, अशी टीका बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे. ते इंदापूर शहरात पत्रकारांशी बोलत होते.
तीस वर्षे नरगसेवक राहिलेल्यांची ही व्यथा असून विश्वासार्हता आवश्यक आहे. त्यामुळे बारामतीत देखील या सगळ्याचा लोकसभेला फरक पडेल. लोकांमध्ये यांच्याबाबत राग आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे नाव देखील बदलायला हवे कारण याच नावावरून देशभरात फसवणूक होते. विधानसभेचे नाव देखील बारामती विधानसभाच आहे. म्हणून लोकसभेचे नाव पुणे दक्षिण विभाग मतदार संघ असे करावे, जेणेकरून देशाचे पंतप्रधान किंवा आणखीन बडे नेते, विदेशी पाहुणे आले की फक्त बारामती शहर दाखवायचे आणि देशभरात बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला असे सांगायचे हे चालणार नाही, परंतु हा विकास बारामती शहरापुरताच मर्यादित आहे. पन्नास वर्षे पवरांच्या हातात सत्ता असतानाही विकास केला गेला नाही असे सांगत त्यांनी बारामतीच्या पवार कुटुंबावर निशाणा साधला.
सोबतच, मला निश्चितच दिल्ली येथे जायला आवडेल असे सांगत २०२४ ला बारामती लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल परंतु आता बारामतीतून दिल्लीत कोण जाणार नाही तर इतर तालुक्यातीलच खासदार होईल, असंही विजय शिवतारे म्हणाले.