बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजयः एकनाथ शिंदे
मुंबईः
खरी शिवसेना कोणाची तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाने दोन्ही ठाकरे तसेच शिंदे गटाला आपापली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी दोन्ही गटांना पदाधीकारी तसेच पक्षातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले दिले होते. त्यानंतर दोन्ही गटाने पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असलेली कागदपत्रं निवडणूक आयोगासमोर सादर केली होती. शिवसेना पक्षाच्या घटनेत २०१८ मध्ये झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या १९९९ च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण २०१८ मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत, असं सांगून निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लोकशाहीला बहुमताला महत्त्व असते. आज आपण पाहिले राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. हा बहुमताचा विजय आहे. लोकशाहीचा विजय आहे. मी पुन्हा एकदा सांगतो बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.