ज्येष्ठ लेखक आणि चित्रपट निर्माते सागर सरहदी यांचे निधन
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि संवाद लेखक, तसेच अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक सागर सरहदी यांचे निधन झाले आहे. ते 87 वर्षांचे होते. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. रविवारी रात्री उशिरा त्यांच्या मुंबईच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वाचा :-शनाया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; करण जोहर करणार लॉन्च
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती बिघडल्यामुळे सरहदी यांना कार्डियाक केअर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयासंबंधित त्रास होत होता. 2018मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी नूरी, बाजार, कभी कभी, सिलसिला, चांदनी, दीवाना आणि कहो प्यार प्यार है, असे चित्रपट लिहिले आहेत.
सरहदी यांचे मूळ नाव गंगासागर तलवार असे होते. बॉलिवूड दिग्दर्शक रमेश तलवार हा त्यांचा पुतण्या. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर त्यांचे गाव होते. फाळणीनंतर आलेल्या रेफ्युजींमध्ये त्यांना सरहदी म्हणून संबोधले जात होते. फाळणीच्या वेळी सरहदी 16 वर्षांचे होते. त्यावेळचा भीषण रक्तपात सरहदी यांनी पाहिला होता. जात, धर्म, नाव यातल्या फोलपणाविषयी ते सतत बोलायचे. त्यांनी लिहिलेल्या पटकथांमधून सामाजिक जाणीव दिसायची. ‘मी सरहदवरून आलेला माणूस. राहतोय सागरकिनारी. मला भूभागावरूनच ओळखायचे असेल तर माझी खरी ओळख ही ‘सागर सरहदी’ ही आहे’, असे सरहदी सांगायचे. अशाप्रकारे गंगासागर तलवार हे नाव सागर सरहदी झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कथाकारांमध्ये सागर सरहदींची गणना केली जाते.