‘सॅनिटरी नॅपकिन’ऐवजी कापडाचा वापर; देशात ५० टक्के महिला मासिक पाळीदरम्यान योग्य सुरक्षा साधनांपासून दूर
नागपूर : मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रिच्या जीवनातील एक अतिशय खासगी परंतु महत्त्वाची बाब. मात्र मासिक पाळीदरम्यान योग्य संरक्षण घेण्याचे प्रमाण अद्यापही अतिशय कमी आहे. देशातील तब्बल ५० टक्के महिला मासिक पाळीदरम्यान संरक्षणासाठी सॅनिटरी नॅपकिनऐवजी कापड वापरत असल्याचे ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सव्र्हे ऑफ इंडिया’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
‘नॅशनल फॅमिली हेल्थ सव्र्हे ऑफ इंडिया’ने १५-२४ वर्षे वयोगट मासिक पाळीच्या संरक्षणासाठी सॅनिटरी नॅपकिनऐवजी कापड वापरत असलेल्या महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये भारताच्या उत्तर भारत आणि ईशान्स भारतातील काही राज्यांमध्ये कापड वापराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. श्रीमंत असलेल्या स्त्रियांच्या तुलनेत गरीब महिलांमध्ये मासिक पाळीत कापड वापरण्याचे प्रमाण तीन पट अधिक असल्याचे दिसून येते. स्थानिक पातळीवर तयार केलेले नॅपकिन, सॅनिटरी नॅपकिन, टॅम्पन्स मासिक पाळीदरम्यान संरक्षणाच्या आरोग्यदायक मानले जातात. मात्र या उपायांपासून अद्यापही ५० टक्के महिला दूर असल्याचे दिसून येते. तरीही सुरक्षित मासिक पाळीसाठी महिला अधिक सतर्क झाल्या आहेत. अस्वच्छ कापडाच्या पुन्हा वापराने अनेक संसर्गचा धोका आहे. कापडाचा वापर २०१५-१६ मधील ६२ टक्केच्या तुलनेत २०१९-२०मध्ये ५० टक्के पर्यंत घसरला आहे.
या राज्यांत सर्वाधिक कापड वापर..
‘नॅशनल फॅमिली हेल्थ सव्र्हे ऑफ इंडिया’च्या सर्वेक्षणातील आकडेवारी पाहिली असता दक्षिण भारतातील राज्य मासिक पाळीमध्ये सुरक्षित सॅनिटरी नॅपकिन वापरत असल्याचे दिसून येते. तामिळनाडूमध्ये १२.७ टक्के तर आंध्रप्रदेशमध्ये ३६.२ टक्के महिला कापडाचा वापर करतात. याउलट उत्तर प्रदेश ६९.४ टक्के, बिहारमध्ये ६७.५ टक्के महिला कापडाचा वापर करतात. ईशान्य भारतातील आसाम ६९.१ टक्के, मणिपूर ६३.९ टक्के, मेघालय ६३.२ टक्के, नागालँड ५६.७ टक्के, त्रिपुरा ५६.१ टक्के, अरुणाचल ३१.५ टक्के, लक्षद्वीप २१.८ टक्के, मिझोराम ११.१ टक्के महिला आताही कापडाचा वापर करतात असे दिसून येते.