आता तर पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्री नाही, ठाकरेंकडून फडणवीसांच्या जखमेवर मीठ
![Now there is no BJP Chief Minister for five years, salt from Thackeray's wounds on Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Now-there-is-no-BJP-Chief-Minister-for-five-years-salt-from-Thackerays-wounds-on-Fadnavis.jpg)
मुंबई: मला दिलेला शब्द भाजपने पाळला असता, तर शानदार पद्धतीने हे सरकार आलं असतं, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला खरमरीत टोला लगावला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अडीच वर्षांपूर्वीचा भाजपसोबतच्या कराराचाही उल्लेख केला. जर माझ्यासोबतचा करार मोडला नसता, तर निदान अडीच वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या जखमेवर मिठ चोळलं आहे.
“माझ्यासोबतचा करार केला असता तर निदान अडीच वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता. आता तर पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्री नसेल. यामध्ये भाजपला काय आनंद आहे. भाजपच्या मतदारांना काय आनंद आहे. जनतेला यातून काय मिळणार हे लवकरच कळेल”, असं म्हणत त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
“माझं आणि अमित शाहांचं हेच तर ठरलं होतं की शिवसेना-भाजपने पुढील पाच वर्षात अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा काळ वाटून घ्यावा, तसं झालं असतं तर आज अडीच वर्ष झालेलीच आहेत, जे काय घडलं ते सन्मानाने झालं असतं. ही आताची जोडगोळी, कदाचित अशाच पद्धतीने त्यांनी अडीच वर्ष पूर्ण केली असती, मग त्यावेळी नकार देऊन भाजपने आताच असं का केलं, हा माझ्याप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“त्यावेळी शिवसेना अधिकृतपणे तुमच्या सोबत होती. लोकसभा-विधानसभेला एकत्र होतो. लोकसभेच्या आधी जे ठरलं होतं, ते हेच होतं, मग मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनवायला लावलं, तसं झालं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता, जे भाजपसोबत जाऊ इच्छितात त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे, की अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि पाठीत वार करुन पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला, तर हा तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, कारण शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही”, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.