लवकरच शिरुरला येतो, आपल्यावरची कारवाई नजरचुकीने, तुम्ही तयारीला लागा : उद्धव ठाकरे
![Coming to Shirur soon, take action against you by mistake, you start preparing: Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Uddhav-Thackeray.jpg)
मुंबई : “शिवेसेनेसाठी तुम्ही गेली १५ ते १८ वर्ष काम करत आहात. पक्षासाठी आणि मतदारसंघासाठी आपण प्रामाणिकपणे लढत आहात. आपल्यावरील कारवाई ही नजरचुकीने झाली. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच शिरुर मतदारसंघात दौरा करणार आहे. तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता तयारीला लागा”, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सांगितले.
शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ येथे भेट घेतली. यावेळी आढळरावांसोबत जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे देखील होते. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचं वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये छापून आलं होतं. आढळराव पाटलांसाठी तो सर्वांत मोठा धक्का होता. आढळरावांच्या थेट भूमिकेने नजरचुकीने कारवाई बातमी छापून आल्याचं ‘सामना’ने स्पष्ट केलं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
“मी गेली १८ वर्ष शिवेसेनेचं प्रामाणिकपणे काम करतोय. जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व असताना त्यांच्यासमोर निकाराने लढा देतोय. मग माझं काय चुकलं?” असा उद्विग्न सवाल आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर, “आढळराव आपण काळजी करु नका. आपला प्रामाणिकपणा आम्हास ठाऊक आहे. कोरोना काळात तर आपल्या कामाची राज्याला दखल घ्यावी लागली. चक्रीवादळ, विविध नैसर्गिक आपत्तीत आपण मदतीसाठी नेहमी पुढे असता. आपण असाच शिवसेनेचा भगवा घेऊन चाला, तुमच्या साथीला मी आहे. लवकरच शिरुर मतदारसंघाचा दौरा करणार आहे. तोपर्यंत तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता तयारीला लागा”, असं उद्धव ठाकरे आढळरावांना म्हणाले.
दुसरीकडे, हकालपट्टीचे वृत्त आल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित करत भविष्यात वेगळा विचार करण्याचे संकेत दिले होते. या कारवाईतून माझी राज्यभर बदनामी झाली, त्याचं काय? आज दिवसभर मी विचार करेन. हवं तर उद्धव ठाकरेंना भेटेन. मग पुढचा निर्णय ठरवूयात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता. मात्र आता उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आढळराव पाटील यांची नाराजी दूर झाली असून उद्धव ठाकरे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात दिलजमाई झाल्याचं बोललं जात आहे.