प्रसारमाध्यमावरील छापेमारी कुठल्या लोकशाहीत बसते? उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा
केंद्र सरकारकडून माध्यमांचा गळा घोटण्याचं काम सुरू
मुंबई : बीबीसीच्या कार्यालयावरती आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या धाडीदरम्यान आधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारी मध्ये ५० हून अधिक आधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याचं बोललं
जात आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
आत्ताची लढाई ही स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई आहे. कुणी म्हणत असेल की आम्ही हिंदूत्व सोडलं तर त्यांचं हिंदुत्व तपासून घेण्याची गरज आहे. मोहन भागवत जेव्हा मशिदीमध्ये जातात तेव्हा त्यांनी हिंदुत्व सोडलं होतं का? राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बीबीसीवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीप्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित केला होता. त्यानंतर आता ही छापेमारी झाली आहे. प्रसारमाध्यमावरील छापेमारी कुठल्या लोकशाहीत बसते? असा प्रश्न उपस्थित केला. माध्यमांचा गळा घोटण्याचं काम सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.