‘राज्यात राष्ट्रपती राजवट लावा’, उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी
मुंबई | ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोषाळकर यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. विरोधी पक्षांकडून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं प्रकरण वरकरणी दिसतं, तेवढं सोप नाही. ज्या गुडांने हत्या केली, त्याने आत्महत्या का केली? हा प्रश्न निर्माण होतो. मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले, त्यामध्ये गोळ्या झाडलेल्या दिसत आहेत. पण त्या कुणी झाडल्या? हे दिसत नाही. या गोळ्या मॉरिसनेच झाडल्या की दुसऱ्या कुणी झाडल्या. हा प्रश्न निर्माण होतो. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोलण्यासाठी आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी माझ्यासाठी शब्द नाहीत. याआधी मी त्यांना उद्देशून फडतूस शब्द वापरला होता. पण आता तोही तोकडा पडतोय. या महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का? असा प्रश्न मला पडला आहे.
हेही वाचा – पुण्यातील निर्भया बनो सभेदरम्यान गोंधळ, पत्रकार निखिल वागळेंसह २०० जणांवर गुन्हे दाखल
श्वान गाडीखाली मेलं तर मी काय करू? असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटले. त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत. तुम्ही अतिशय निर्ढावलेले, निर्घृण आणि निर्दयी मनाचे गृहमंत्री आहात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे सर्वच प्राण्यांची आणि माणसांची जबाबदारी येते. एका युवा नेत्याची हत्या होत असताना त्याची बरोबरी तुम्ही श्वानाबरोबर कशी काय करता? दिल्लीश्वरांसमोर तुम्ही श्वानासारख्या शेपट्या हलविता, हे जनतेला समजलेले आहेच. पण राज्यात गुंडगिरी करा, खूनखराबा झाला तरी घाबरू नका… पण भाजपात आला तर सर्व विसरून जाऊ ही गुंडासाठी मोदी गॅरंटी आहे का? असे दिसत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अभिषेक घोसाळकर प्रकरणात आम्ही राज्यपालांकडे जाणार नाहीत. कारण याआधीचे राज्यपाल जरा जास्तच कर्तव्यदक्ष होते. माजी राज्यपाल कोश्यारी यांचा मॉरिस या गुंडाचा एकत्र फोटो आहे. राज्यपालांच्या हस्ते अशा गुंडांचे सत्कार होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
पोलिसांना माझी नम्र विनंती आहे की, मी मुख्यमंत्री राहिलो आहे. माझ्या कार्यकाळात मी पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहिलो. त्यांना जर मोकळा हात दिला तर ते २४ तासात गुंडाना तुरुंगात टाकतील. पण सरकार गुंडाच्या मागे उभे राहिले असेल तर हिंसाचार असाच कायम राहिल. मागच्या महिन्यात आम्ही जनता न्यायालय भरवून थोतांड समोर आणले होते. तसेच आज माध्यमांच्या माध्यमातून हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहे. राज्यातील घटनाबाह्य सरकारचा प्रशासनावर वचक राहिला नसून त्यांना कारभार करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला झापूनही काही उपयोग नाही. कारण हे सरकार शब्दांच्या माराच्या पुढे गेले आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.