‘योगेश कदमांना संपवायच्या षडयंत्राच्या बैठकीत मी होतो’; उदय सामंतांचा भरसभेत गौप्यस्फोट
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रत्नागिरीमधील गोळीबार मैदानात सभा पार पडली. या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, उदय सामंत, योगेश कदम यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून कसे प्रयत्न झाले, यावर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं.
उदय सामंत म्हणाले की, योगेश कदमांना राजकीयदृष्ट्या कसं संपवायचं? हे षडयंत्र ज्या बैठकीत रचलं. त्या बैठकीला मीदेखील उपस्थित होतो. दापोलीच्या निवडणुकीत योगेश कदमांना किती तिकिटं द्यायची, यावर फार मोठी चर्चा झाली. त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादीला जास्त तिकिटं द्यायची, असा अघोषित नियम झाला होता. नंतर योगेश कदमांना काहीच द्यायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस रुजवायची हा निर्णय शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला.
पाच तारखेची सभा ही कॉर्नर सभा होती. ती विचार देणारी सभा नसून शिवीगाळ करणारी सभा होती. गेल्या ५० वर्षात अनेक मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं. आठ महिन्यांपूर्वी शिंदेंनी आम्हाला गुवाहाटीला नेऊन आणलं. ते काही लोकांना इतकं वर्मी लागलंय, की अजून ते बाहेरच आले नाहीयेत, असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.