तामिळनाडूत तुफान पाऊस; ३ ठार, चेन्नईत रेड अलर्ट
चेन्नई | टीम ऑनलाइन
तामिळनाडूत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे तिथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे तिघांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील रस्ते जलमय झाले आहेत. दरम्यान, येत्या ४८ तासांत चेन्नई, कांचीपूरम, तिरूवल्लूर आणि चेंगलपट्टू या ४ जिल्ह्यांत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने २४ तास मदत केंद्र सुरू केली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दिली.
चेन्नई आणि परिसरात गुरुवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्ते जलमय झाल्याने वाहतूककोंडी झाली आहे. अनेक वाहने पावसाच्या पाण्यामुळे बंद पडली आहेत. पावसामुळे विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तामिळनाडूचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री रामचंद्रन यांनी दिली. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत केंद्र स्थापन केली आहेत. ती २४ तास कार्यरत आहेत. लोकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. अन्यथा कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. चेन्नई आणि उपनगरांत पावसामुळे अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर साचलेले पाणी उपसण्यासाठी १४५ ठिकाणी पंप बसवले आहेत, अशी माहिती ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनचे आयुक्त गगनदीप सिंग बेदी यांनी दिली.