“उद्या ते असंही म्हणतील तुम्ही शाळाच भरवू नका; दहा-पंधरा जण रस्त्यावर आले म्हणजे…”
मुंबई |
परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे. नागपुरात आंदोलक विद्यार्थ्यांकडून बसही फोडण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू यांनी सांगितलं की, “खरंतर हिंदुस्थानी राजा म्हणून कोणीतरी या आंदोलनाची सुरूवात केली होती. नेमकं त्यांच्या मागण्या ऑनलाईन परीक्षा घेऊ नका किंवा रद्द करा परीक्षा अशा काही मागण्या आहेत. आपण निश्चितच त्यांची नेमकी मागणी काय आहे आणि या आंदोलनाचं नेमकं कोणी नियोजन केलं हे पाहू. पण शिक्षण विभागाचं काम आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करू. कोणी त्याची मागणी करण्याची गरज नाही. शिक्षण विभाग यामध्ये परीपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचं भलं कसं होईल? त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया कसं जाणार नाही, याचाच आम्ही विचार करत आहोत.”
तसेच, “दहा-पंधरा जण रस्त्यावर आले म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे असं बोलणं चुकीचं होईल. माध्यमांनी हे देखील पाहीलं पाहिजे. ५० विद्यार्थी नागपुरात जमा झाले आणि त्यांनी मागणी केली म्हणजे नागपुरमध्ये दोन लाख विद्यार्थी आहेत, त्यांचा विचार तुम्ही घेतला का? नाही घेतला. त्याची तपासणी करणं देखील फार महत्वाची आहे. १००-२०० विद्यार्थी रस्त्यावर येणार आणि ते सांगणार परीक्षा ऑनलाईन घेऊ नका, ते म्हणतात परीक्षाच घेऊ नका. उद्या ते असंही म्हणतील तुम्ही शाळाच भरवू नका, असं होणार नाही.” असंही यावेळी बच्च कडू यांनी स्पष्ट केलं.
याचबरोबर, “बऱ्याच जणांच्या आमच्याकडेही मागण्या येत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की, परीक्षेला वेळ द्या. उशीरा परीक्षा घ्या म्हणजे आमचा अभ्यास होईल. बऱ्याच विद्यार्थ्यांचा ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ते म्हणातात परीक्षा घ्या कारण या पद्धतीने जर गेलं तर मला दहावीत जे ९० टक्के मार्क होते यातून आम्हाला सरासरी मिळेल, ते फार कमी मिळेल. हा सगळा विचार करावा लागेल. कोणी एखाद्याने मागणी केली आणि माध्यमांनी ते दहावेळा दाखवलं म्हणजे ते सत्य असतं असं नाही.” असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.
तर, “ज्यांचा शिक्षणाशी संबंध नाही अशी काही चुकीचे माणसं कदाचित या आंदोलनाच्या मागे असू शकतात. परंतु आपण पडताळणीशिवाय हे सत्य मानणार नाही. विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीच्या वळणावर जाऊ नये. विद्यार्थ्यांनी एकाएकी हे आंदोलन केलेलं आहे. त्यांनी जर अगोदर निवेदन दिलं असतं तर कदाचित आपण त्यांना चर्चेला देखील बोलावलं असतं. पोलिसांना देखील आमचं सागणं आहे की त्यांनी हे आंदोलन अतिशय शांतपणे हाताळावं, कारण ते विद्यार्थी आहेत. त्यांना भविष्यात काही अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आंदोलनाच्या मागण्यासंदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत.” अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली.