सुपरमार्केटमधील वाइनविक्रीच्या सरकारी निर्णयावर सयाजी शिंदे म्हणाले, “कोंबडीएवढं ज्ञान…”
मुंबई |
राज्यातील मोठया सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय आणि त्यावरुन सध्या राज्यात सुरु असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींदरम्यान या प्रकरणावर समाजिक कार्यामध्ये स्वत:ला झोकून देणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी मत व्यक्त केलंय. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपळे येथे सह्याद्री देवराई लोकार्पण सोहळा आज सयाजी शिंदेंच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यानंतर त्यांना वाईन विक्रीसंदर्भातील प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता त्यांनी यावर मिश्कील भाष्य केलं आहे.
कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वृक्षारोपण आणि इतर विषयांवर चर्चा करुन झाल्यानंतर अचानक एका पत्रकारने सयाजी शिंदेंना वाइन विक्रीसंदर्भातील प्रश्न विचारला. त्यावर आधी प्रश्न ऐकून सयाजी शिंदे हसले. त्यानंतर त्यांनी चांगल्या वाईट गोष्टींचं ज्ञान आपलं आपल्याला हवं असं मत व्यक्त केलं. या प्रश्नाला उत्तर देताना सयाजी शिंदेंनी, “जगात चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. कोंबडीला सांगता येत नाही की दगड खा अन् माती खा. माणसाला कळलं पाहिजे ना दगड खायचे की माती खायची. त्यामुळं कोंबडीएवढं ज्ञान असलं तरी पुरे झालं,” असं म्हटलं. सयाजी शिंदेंनी दिलेलं उदाहरण आणि प्रतिक्रिया ऐकून उपस्थितांना एकच हसू फुटलं.
- जनतेचा विश्वासात घेऊन निर्णय घेणार…
दरम्यान वाइन विक्रीचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही. लोकांकडून या निर्णयावर हरकती व सूचना मागवण्यात येणार असून त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काही दिवसांपूर्वीच सांगितलं आहे.
वाइन विक्रीला विरोध म्हणून अण्णा हजारे यांनी सोमवारपासून उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र किराणा दुकानातून वाइन विक्री करणार नाही तसेच वाइन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यामुळे अण्णा हजारेंनी हे उपोषण मागे घेतलं होतं.