Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील आणखी तीन आमदारांना मंत्रिपदासाठी फोन; दिल्ली- ठाणे कनेक्शन समोर

मुंबईः राज्यात स्थापन झालेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी रियाझ शेख आणि त्याच्या साथीदारांनी राहुल कुल यांच्यासह आणखी तीन आमदारांना संपर्क केला होता, असे तपासातून समोर आले आहे. दिल्लीमध्ये एक बडा नेता संपर्कात असल्याचे चौघे सांगत असल्याने त्यांचे दिल्ली कनेक्शन आणि यातील दोघे ठाण्याचे असल्याने त्यांचे ठाणे कनेक्शन नेमके काय आहे? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांना रियाझ शेख या तरुणाने दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत ओळख असल्याचे सांगून मंत्रिपदासाठी १०० कोटी रुपयांची मागणी केली. कुल यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रियाझ याच्यासह नागपाडा येथील जाफर उस्मानी, ठाणे येथील योगेश कुलकर्णी आणि सागर संगवई यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. या चौघांची चौकशी केली असता, त्यांनी मंत्रिपद मिळवून देण्यासाठी कुल यांच्यासह तीन आमदारांना फोन केल्याचे समोर आले. पोलिसांनी या तीन आमदारांकडून याबाबतची अधिक माहिती जाणून घेणार आहेत. या चौघांनी ज्याप्रकारे दिल्लीमधील नेत्याची जवळीक दाखवून फोन करण्याची हिम्मत दाखवली, ते पाहता नेमके दिल्ली कनेक्शन कोणते आहे, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. योगेश आणि सागर हे ठाण्याचे रहिवासी आहेत, त्यामुळे त्याचे देखील ठाणे कनेक्शन आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत निर्णय लागेपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याआधी जास्तीत जास्त आमदारांना जाळ्यात ओढण्याचा त्यांचा कट होता.

२०, ५०, ३०चा फॉर्मुला
रियाज शेख याने आमदारांपुढे २०, ५० आणि ३० टक्के असा फॉर्मुला ठेवला होता, असे चौकशीतून पुढे आले आहे. मंत्रिपदाची चर्चा करण्यासाठी आगाऊ २० टक्के रक्कम द्यावी लागणार. कोणते मंत्रिपद मिळणार हे निश्चित झाल्यानंतर ५० टक्के आणि शपथविधी झाल्यानंतर उर्वरित ३० टक्के रक्कम द्यावी लागेल, असा फॉर्मुला ठरला होता. याबाबतही पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button