खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिऊन तिघांचा बळी, ४७ जण गंभीर, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन
अमरावती: जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने ५० जणांची प्रकृती खराब झाली होती. या सगळ्यांना डायरिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४७ जण गंभीर जखमी आहेत. या घटनेची बातमी कळताच दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्याच्याशी संवाद साधला.
या सर्वांवर तातडीने उपचार करावेत. तसेच, गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असली तरीही उर्वरित लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून दिली. यावेळी या सर्वांना योग्य उपचार मिळतील, तसेच मृतांचा आकडा वाढू नये यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी ३० जणांची प्रकृती बिघडली, दोघांचा मृत्यू
गुरुवार (७ जुलै) रोजी पाचडोंगरी येथेही दूषित पाणी पिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. तर अंदाजे २० ते ३० जणांची प्रकृती बिघडली होती. चिखलदरा तालुक्यातील कोयलारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाच डोंगरी गावाचे पाणीपुरवठा काही दिवसापासून बंद असल्यामुळे गावकरी गावातील रज्जी भानू अखण्डे यांच्या खाजगी उघड्या विहिरीतून पिण्यासाठी पाणी वापरत होते. ही विहीर पूर्णपणे उघडी असून कोणत्याही प्रकारचं शुद्धीकरण झालेलं नव्हतं. हे पाणी पिल्याने गावातील गंगाराम नंदराम धिकार (वय २५) आणि सविता सहदेव अखंडे (वय ३०) या दोघांचा मृत्यू झाला होता.