दिल्ली दंगलप्रकरणी तिघांना जामीन; पोलीस सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली |
गेल्या वर्षी ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलींच्या प्रकरणांत ३ विद्यार्थी कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या ३ वेगवेगळ्या निर्णयांना दिल्ली पोलिसांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील नताशा नरवाल व देवांगना कलिता आणि जामिया मिलिया इस्लामियातील आसिफ इक्बाल तन्हा या ३ विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला होता.
मतभेद दडपण्याच्या प्रयत्नात सरकारने निषेध नोंदवण्याचा अधिकार व दहशतवादी कृत्य यातील सीमा पुसून टाकली असून, अशी मानसिकता वाढली तर तो लोकशाहीसाठी दु:खाचा दिवस असेल, असे न्यायालयाने म्हटले होते. कठोर अशा बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यातील ‘दहशतवादी कृत्याची’ व्याख्या काहीशी संदिग्ध असल्याचे सांगून, या विद्यार्थी कार्यकर्त्यांना जामीन नाकारणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला होता.