अनलॉकबाबतचा प्रस्ताव आज मुख्यमंत्र्यांकडे गेला, दुपारपर्यंत अधिसूचना निघेल- विजय वडेट्टीवार
नागपूर – राज्यात कोरोना संसर्ग कमी होत असल्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकच्या प्रक्रियेची घोषणा केली. मात्र, तासाभरताच राज्य सरकारने युटर्न घेतल्याने राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यावरून विजय वडेट्टीवार यांनी आज पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. अनलॉकबाबत आज मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला असून दुपारपर्यंत अधिसूचना निघेल अशी माहिती दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेने गुरुवारी गोंधळ उडाला होता. यामुळे सारे निर्बंध शिथिल झाले, असं चित्र निर्माण झालं. पण असा कोणताही निर्णयच झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं.
“अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “विरोधक म्हणून त्यांची भूमिका योग्य असून त्यांना ती मांडावीच लागते. पण यामध्ये श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. सरकार म्हणून जे काही करावं लागतं ते आम्ही करत असतो”.
वडेट्टीवारांची घाई
मंत्री वडेट्टीवार यांनी राज्यातील निर्बंध हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा करीत एकच गोंधळ उडवून दिला. पहिल्या टप्प्यात उद्यापासून औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या १८ जिल्ह्यांतील टाळेबंदी- सर्व निर्बंध हटविण्याची आणि अन्य जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
वडेट्टीवार यांच्या घोषणेने सारे निर्बंध शिथिल झाले असेच चित्र तयार झाले. आता कोणतेही निर्बंध राहिलेले नाहीत, असे संदेश समाजमाध्यमांवरून फिरू लागले. शेवटी मुख्यमंत्री कार्यालयाला स्पष्टीकरण करावे लागले आणि असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे जाहीर करावे लागले.
विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण
राज्यातील काही जिल्ह्यांत लॉकडाउन काढण्याचा प्रस्ताव असून त्यास आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना तत्त्वत: हा शब्द विसरून गेलो असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलं होतं.