शिंदे गटातील आमदाराने दानवेंचाच खास माणूस फोडला, बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
- औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडी
औरंगाबाद । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर औरंगाबदेत एकमेकांचे खास कार्यकर्ते फोडण्याची चुरस पाहायला मिळत आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल खडसे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंचे खंदे समर्थक विश्वनाथ राजपूत (माजी नगरसेविका प्राजक्ता राजपूत यांचे पती ) आणि ठाकरे गटातील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार प्रदीप जैस्वाल यांनी गळाला लावलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला स्थानिक पातळीवर सुरुवात झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर त्यांना औरंगाबदेतून मोठं पाठबळ मिळालं होतं. जिल्ह्यातील दोन तत्कालीन मंत्र्यांसह पाच आमदारांनी त्यांना समर्थन दर्शवलं होतं. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर औरंगाबादच्या वाट्याला अब्दुल सत्तार यांच्या रुपाने कृषिमंत्री तर संदिपान भुमरे यांच्या रुपाने रोहयो मंत्री व स्थानिक पालकमंत्री पद मिळाले. हे पाच आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर युवा सेनेचे पदाधिकारी व माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ हेसुद्धा विरोधी पक्ष नेते व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करून एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते.
आता शिंदे गटातील आमदार प्रदीप जैस्वाल यांनी अंबादास दानवे यांच्या विश्वासातील मानल्या जाणाऱ्या विश्वनाथ राजपूत यांना गळाला लावत शिंदे गटात सामील केले आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर जैस्वाल यांनी खेळलेली खेळी महत्त्वाची मानली जात असून अनेक दिवसांपासून मनसेच्या कार्यक्रमाला दांडी मारणारे मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल खडसे यांनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसह जैस्वाल यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केला आहे. जैस्वाल यांनी सुरु केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला आता अंबादास दानवे कसे उत्तर देणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.