“मविआ सरकार पडण्याचे मुख्य कारण नाना पटोले”; सामनातुन गंभीर आरोप
घराण्यांशी नाहक पंगा घेऊन राज्यात त्यांचा पक्ष कसा वाढणार?
मुंबई : काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचा वाद शिगेला पोहोचला आहे. थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातुन नाना पटोले यांना महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास दोषी धरलं आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही. विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्त्वाचे ठरते. अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक राज्यपालांनी होऊच दिली नाही व त्याचाच फायदा पुढे खोके बाज आमदार व त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीस मिळाला. तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा घिसाडघाईचा व अपरिपक्व होता. पुढे हेच पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एक निर्णयामुळे कायमचे संकटात आले हे सत्य मान्य करावेच लागेल, असा थेट आरोप सामनातुन करण्यात आला आहे.
पटोले हे मेहनती आहेत व भारतीय जनता पक्षात बंड करून ते काँग्रेस पक्षात आले. ते पक्षवाढीसाठी कष्ट घेतात, पण संकटकाळात ज्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले अशा घराण्यांशी नाहक पंगा घेऊन राज्यात त्यांचा पक्ष कसा वाढणार? पटोले यांनी वाद न वाढवता पक्ष पुढे नेला तर २०२४ साली महाविकास आघाडीस नक्कीच फायदा होईल. नाहीतर २०२४ आधी कमळाबाईवरील भुंगे काँग्रेसच्या उरलेल्या मधाच्या पोळ्यावर बसतील, असा सल्लाही सामनातुन पटोलेंना दिला आहे.