आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेल्या – मोदी
नवी दिल्ली – आपण पहिल्या लाटेवर मात केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच आता देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी त्यांच्या रेडिओवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनच्या आठवणींना उजाळा दिला. ‘मागील वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण देशासाठी आदर्श उदाहरण ठरला. शिस्तीचे हे अभूतपूर्व असे उदाहरण होते. येणाऱ्या पिढ्यांना याचा गर्व वाटेल’, असे मोदी म्हणाले. त्याचबरोबर ‘कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे, हे सर्व कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेले. त्यामुळेच कोरोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिले’, असेही मोदींनी म्हटले.
वाचा ;-देशात कोरोनाचा उद्रेक! 24 तासांत तब्बल 62,714 नव्या रुग्णांची नोंद
पंतप्रधान म्हणाले, ‘मागील वर्षी आपल्यासमोर प्रश्न होता की, कोरोना लस कधी येणार? आता आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे.’ तसेच मोदींनी यावेळी विविध क्रीडा प्रकारात ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले. ‘योगायोग म्हणजे मार्च महिन्यात जेव्हा आपण महिला दिन साजरा करत होतो, तेव्हा अनेक महिला खेळाडूंनी पदकं आणि विक्रमांची नोंद आपल्या नावावर केली. दिल्लीत झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारत पहिल्या क्रमाकांवर राहिला. सुवर्ण पदकांमध्येही भारताने बाजी मारली. भारताच्या महिला आणि पुरुष नेमबाजांनी जबरदस्त कामगिरी केली. याचदरम्यान पी.व्ही. सिंधूनेही रौप्य पदक पटकावले’, असे कौतुक पंतप्रधानांनी केले.