करवाचौथला केला उपवास आणि मग केली पतीची हत्या
पतीच्या छळाला कंटाळलेल्या महिलेने करवाचौथच्या दिवशीच पतीची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी कविता सैनी (वय ४५) या महिलेला अटक केली असून संशय येऊ नये म्हणून तिने करवाचौथला उपवास देखील केला होता.
मेरठमध्ये राहणाऱ्या कविता सैनीचा विवाह सुंदरपाल याच्याशी झाला होता. सुंदरपाल हा पत्नी आणि मुलगा कुलदीपला दररोज मारहाण करायचा. यामुळे कविता कंटाळल्या होत्या. आठ वर्षांपूर्वी सुंदरपालने किरकोळ भांडणातून स्वत:च्या १४ वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या देखील केली होती. मुलीने आत्महत्या केल्याचे त्याने सर्वांना सांगितले होते. मात्र, पतीच्या भीतीमुळे कुटुंबातील एकाही सदस्याने याची पोलिसांकडे तक्रार केली नाही. यामुळे कविताच्या मनात पतीविषयी राग होता. या रागातूनच तिने पतीच्या हत्येचा कट रचला. यात तिने मुलगा कुलदीप आणि घरात काम करणाऱ्या शाद्री याची मदत घेण्याचे ठरवले.
करवाचौथला रात्रीच पतीची हत्या करायचा कट तिने रचला. संशय येऊ नये म्हणून तिने दिवसभर उपवास केला. रात्री चंद्रोदयानंतर तिने पतीचा चेहरा पाहून उपवास सोडला. यानंतर रात्री उशिरा कविताने पतीच्या डोक्यावर प्रहार करत त्याची हत्या केली. यानंतर कविताने शेजारच्यांना घरी बोलावले. पतीला रक्ताच्या उलट्या होत असल्याचे तिने शेजारच्यांना सांगितले. शेजारचे घरी आले असता त्यांना सुंदरपाल याच्या डोक्यालाही दुखापत झाल्याचे लक्षात आले. संशय आल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. अखेर पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघड झाला.