ताथवडे- पुनावळेतील पायाभूत सुविधांसाठी संदीप पवार यांचा पुढाकार।
- वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधले
- महापालिका आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
ताथवडे येथील पाण्याची टाकी व पुनावळेतील एसटीपीचे आरक्षण ताब्यात घेवून तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ताथवडे- पुनावळे गावातील नागरीकरण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. मात्र, त्या तुलनेत पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करणे अपेक्षीत आहे. परिसरातील बांधकाम प्रकल्प वाढले असून, लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यादृष्टीने पाणी पुरवठा, एसटीपी, ड्रेनेज व्यवस्था यासंदर्भातील प्रकल्प मार्गी लावणे अपेक्षीत आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून ताथवडेतील पाण्याच्या टाकीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत माजी नगरसेविका श्रीमती यमुनाताई पवार यांच्या कार्यकाळात (२०१२-२०१७) केंद्र शासन, राज्य शासन आणि महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. विेशेष म्हणजे, जलवाहिनीचे कामही काहीप्रमाणात पूर्ण झाले होते. मात्र, २०१७ मध्ये महापालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर पाण्याच्या टाकीचे काम झालेले दिसत नाही.
दरम्यान, कोविड आणि लॉकडाउनच्या काळात विकासकामांची गती मंदावली होती, असे गृहित धरले तरी गेल्या पाच वर्षांच्या काळात पाण्याच्या टाकीचे काम मार्गी लागणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झालेले दिसत नाही. परिणामी, परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कमी आणि अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
- ताथवडे, पुनावळेतील नागरिकांना न्याय द्या : पवार
दुसरीकडे, पुनावळे गावातील सांडपाणी निचरा प्रकल्प (एसटीपी) मंजूर झाले होते. त्यासाठी निधीही मंजूर झाला होता. मात्र, अद्याप ताथवडे किंवा पुनावळेतील एसटीपीचे आरक्षणही ताब्यात घेतलेले नाही. परिणामी, परिसरात निर्माण होणारे सांडपाणी थेट पद्धतीने पाण्यात सोडले आहेत. तसेच, सांडपाणी ठिकठिकाणी साचल्यामुळे नागरी आरोग्याच्या समस्येचाही सामना करावा लागतो.वाढती लोकसंख्या आणि निर्माण होणारे गृहप्रकल्प याचा विचार करता महापालिका प्रशासनाने ताथवडे व पुनावळेत पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करणे अपेक्षीत आहे. एसटीपी आणि पाण्याची टाकीचे आरक्षण विकसित करुन स्थानिक नागरिकांना न्याय द्यावा, असे साकडे राजेश पाटील यांना घालण्यात आले आहे.