लोकसभेतून खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं निलंबन; सुप्रिया सुळे म्हणाल्या..
नवी दिल्ली : संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात खासदारांनी मोठा गोंधळ घातला. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी एकाच दिवसात तब्बल ९२ खासदारांचं निलंबण करण्यात आलं. कालच्या निलंबनावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. अशातच आजही आणखी ४९ खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.
लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्यासह आणखी ४९ खासदार निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. आतापर्यंत दोन्ही सभागृहातील १४१ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीच्या मार्गानं आम्ही निवडून आलोय. पण दडपशाही सुरु झाली. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त खासदार निलंबीत झाले आहेत, संसदेत हल्ला झाला, त्यासंदर्भात आम्ही चर्चेची मागणी केली. पण प्रश्न विचारणारे बाहेर आहेत.
हेही वाचा – ‘अनेक दिवसांपासून मी जरांगेंच्या सोबत’; अंतरवाली सराटी घटनेतील आरोपीची प्रतिक्रिया
सत्ताधाऱ्यांना विरोधक नको आहेत, त्यामुळे निलबंनाची कारवाई करण्यात आली. आमचं सरकार होतं, त्यावेळी आम्ही कधीचं असं केले नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी येऊन संसदेत झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन द्यावे, त्यावर चर्चा व्हायला हवी आहे. पण सरकारला चर्चा करायची नाही, दडपशाही सुरू आहे. तसेच, लोकशाहीसाठी आजचा दिवस काळा, लोकशाहीचा आवाज दाबण्याचं पाप आज दिल्लीमध्ये होतंय. विरोधी पक्षाला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आज ‘या’ खासदारांचं निलंबन
सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव, दानिश अली या खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.