TOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीमुंबई

गणरायाला राजा-महाराजा आदी उपाधी देऊन प्रसिद्धी मिळविण्याची धडपड

मुंबई | स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात उत्सवांमध्ये जनजागृतीला महत्त्व देण्यात येत होते. मात्र जसजशी वर्षे सरत गेली तसतसे उत्सवाचे रूप बदलत गेले. मुंबईत तर उत्सवाला ओंगळवाणे रूप येऊ लागले. उंच गणेशमूर्तीची स्पर्धा सुरू झाली. ठिकठिकाणच्या मंडळांनी आपल्या गणरायाला राजा-महाराजा आदी उपाधी देऊन प्रसिद्धी मिळविण्याची धडपड सुरू केली.

पारतंत्र्य काळात ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी भारतीयांमध्ये ऐक्याची भावना निर्माण होण्याची नितांत गरज होती. भारतीयांना उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आणता येऊ शकते हे ओळखून लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीची मुहूर्तमेढ रोवली. पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला आणि सनातनी मंडळींनी टीकेचे आसूड ओढण्यास सुरुवात केली. घरच्या देव्हाऱ्यातील देव रस्त्यावर आणले असा आक्षेप घेत सार्वजनिक उत्सवाला विरोध सुरू झाला. मात्र लोकमान्य ठाम राहिले. पुण्यापाठोपाठच मुंबईतही सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रतिसाद मिळू लागला, गर्दी होऊ लागली. खेळे, मेळे, व्याख्याने, पोवाडे, कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती होऊ लागली. उत्सवाच्या माध्यमातून ऐक्य आणि जनजागृतीचा मुख्य उद्देश सफल होऊल लागला. कालौघात भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि उत्सवांचा नूरच बदलून गेला.

मुंबई-पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आणि होत आहे.

स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात उत्सवांमध्ये जनजागृतीला महत्त्व देण्यात येत होते. मात्र जसजशी वर्षे सरत गेली तसतसे उत्सवाचे रूप बदलत गेले. मुंबईत तर उत्सवाला ओंगळवाणे रूप येऊ लागले. उंच गणेशमूर्तीची स्पर्धा सुरू झाली. ठिकठिकाणच्या मंडळांनी आपल्या गणरायाला राजा-महाराजा आदी उपाधी देऊन प्रसिद्धी मिळविण्याची धडपड सुरू केली. नवसपूर्तीच्या कहाण्यांनी भाविकांवर मोहिनी टाकण्यास सुरुवात झाली.

अनेक राजकारण्यांनी मतपेढय़ांवर डोळा ठेवून मंडळांना बक्कळ बिदागी देऊन आपलेसे करण्याचा चंगच बांधला. आर्थिक मदतीचा मोठा हात देणारा राजकारणी आपला अशीच भावना अनेक मंडळांची झाली. गणेश आगमन-विसर्जन मिरवणुकांना ओंगळवाणे रूप आले. गणेशोत्सवात अचकट विचकट अंगविक्षेप करीत मिरवणुकांमध्ये नाचणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या वाढू लागली. वर्चस्वावरून मंडळांमध्ये हाणामाऱ्या, हेवेदावे सुरू झाले. मंडळांमध्ये वितुष्ट येऊ लागले. मूळ मुद्दय़ापासून गणेशोत्सव वेगळय़ाच दिशेला भरकटू लागला. एकूणच गणेशोत्सवात समाजाची अधोगती सुरू झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात गणेशोत्सवाला आलेले ओंगळवाणे स्वरूप बदलण्यासाठी एक चळवळ उभी राहिली. मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे प्रबोधन करून काही प्रमाणात या प्रकारांना आवर घालण्यात यशही आले. परंतु पुन्हा एकदा गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भरकटताना दिसत आहेत. मोठय़ा संख्येने तरुण-तरुणीही त्यात सहभागी होत आहेत.

समाजप्रबोधनपर देखावे, चलचित्र ही मुंबईमधील गणेशोत्सवांची एके काळची खासियत. सामाजिक प्रश्न, राजकीय घडामोडींबाबत राजकारण्यांच्या डोळय़ात अंजन घालणारे देखावे साकार करून अनेक मंडळांनी आपली बांधिलकी जपली होती; परंतु आता अभावानेच असे देखावे पाहावयास मिळतात. गेल्या काही वर्षांपासून उंच गणेशमूर्ती हेच मुख्य आकर्षण बनू लागले आहे. राजा, महाराजांच्या प्रसिद्धीसाठी मंडळांमध्ये स्पर्धा जुंपली आहे. आगमन-विसर्जन मिरवणुकींच्या निमित्ताने पुन्हा एकदा ओंगळवाणे दर्शन घडू लागले आहे. सामाजिक भान हरपत चालले आहे. केवळ आर्थिक गणित जुळवून उत्सव साजरे होताना दिसत आहे. पुन्हा एकदा उत्सवाला ओंगळवाणे रूप येते की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे.

दर्शन

लालबाग, परळ भागात गणेश आगमन मिरवणुकीच्या निमित्ताने ही भीती खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे. करोनाविषयक निर्बंधांचे विघ्न नसल्याने यंदा गणेशोत्सव मोठय़ा धूमधडाक्यात साजरा होणार याची सर्वानाच कल्पना आहे. पण गणेश आगमन मिळवणुकीपासूनच त्याचा इतका त्रास होईल याचा कुणी विचारच केला नसावा.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मागणीनुसार लालबाग, परळ परिसरातील गणेश कार्यशाळांमध्ये मोठय़ा संख्येने उंच गणेशमूर्ती साकारण्यात येतात. कार्यशाळांमध्ये साकारलेल्या गणेशमूर्ती गणेश चतुर्थीपूर्वीचा सुट्टीचा दिवस पाहून मंडपस्थळी वाजतगाजत घेऊन जातात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच्या दोन-तीन शनिवार-रविवारी लालबाग, परळ उत्सवी वातावरणात बुजून जाते. गेली अनेक वर्षे हे सुरू आहे. परंतु आता गणेश आगमन मिरवणुकांतील उत्साह टिपेला पोहोचला आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ची शनिवारी आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अगदी उपनगरापल्याड परिसरातूनही तरुण-तरुणी शनिवारी चिंचपोकळीत दाखल झाले होते. यानिमित्ताने या परिसरात अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती. ढोल-ताश्याच्या गजरात थरकत बकरी अड्डय़ावरील गणेश कार्यशाळेतून ‘चिंतामणी’ची आगमन मिरवणूक मंडपाच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागली. अत्यंत बेशिस्तपणे ही मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांची फौज तैनात केल्याचा दावा करण्यात आला आहे. मग महिला-मुलींची छेडछाड, हुल्लडबाजी, चेंगराचेंगरी, पाण्याच्या बाटल्या, चप्पलफेकीचे प्रकार मिरवणुकीत घडलेच कसे, असा प्रश्न आहे. या प्रकारांमुळे पोलीस, वाहतूक पोलीस आदी यंत्रणांवर कमालीचा ताण आला होता. परंतु मिरवणुकीदरम्यान बेशिस्त वर्तन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे या मंडळींना अवघड बनले होते. काही वर्षांपूर्वी याच मंडळाच्या गणेश आगमन मिरवणुकीत हुल्लडबाजीचा प्रकार घडला होता. त्या वेळी हुल्लडबाजांनी मिरवणुकीच्या मार्गातील सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले होते. त्याच वेळी अशा मिरवणुकांबाबत ठोस निर्णय घेतला असता तर आज त्याची पुनरावृत्ती झाली नसती.

गणेशोत्सव काळात अनेक ठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांची गर्दी होते. मग चेंगराचेंगरी, गणेशदर्शनाच्या वशिलेबाजीवरून वाद, मंडळाचे पदाधिकारी-पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी असे प्रसंग उद्भवतात. आता हे प्रकार वाढू लागले आहेत. अशा प्रकारांना वेसण घालण्याची नितांत गरज आहे. अन्यथा सार्वजनिक गणेशोत्सव पुन्हा एकदा वेगळय़ाच दिशेला भरकटत जाईल. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत चालणारे कार्यक्रम, ध्वनिक्षेपकांचा अतिवापर, पहाटेपर्यंत वाजतगाजत जाणाऱ्या मिरवणुकांमुळे होणारा त्रास लक्षात घेऊन न्यायालयाने निर्बंध घातले. आता आणखी कडक निर्बंध घालण्याची वेळ मंडळांनी आणली आहे. गणेशोत्सवाचा मूळ हेतूच हरवू लागला आहे. त्यामुळे शासन, प्रशासन आणि सुजाण नागरिकांनी पुढे येऊन या उत्सवाचे पावित्र्य जपण्याची गरज आहे. उत्सवाला ओंगळवाणे रूप देणाऱ्या, परस्परांमध्ये स्पर्धा निर्माण करणाऱ्या प्रसिद्धिलोलूप मंडळांच्या अतिउत्साहाला आवार घालण्याची वेळ आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button