U-19 Asia Cup | ठरलं! भारत–पाकिस्तान महामुकाबला ‘या’ दिवशी रंगणार

U-19 Asia Cup | भारतीय अंडर-१९ संघाने आशिया चषक २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुबईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारत अंडर-१९ संघाने श्रीलंका अंडर-१९ संघावर ८ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवत फायनलचे तिकीट मिळवले. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान अंडर-१९ संघाशी होणार आहे.
दुबईमध्ये पावसामुळे सेमीफायनल होईल की नाही, याबाबत साशंकता होती. अखेरीस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सामना ५० ऐवजी २० षटकांचा करण्यात आला. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार श्रीलंकेचा अंडर-१९ संघ २० षटकांत केवळ १३८ धावांवर मर्यादित राहिला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने १८ षटकांत २ गडी गमावत १३९ धावा करत सहज विजय नोंदवला. भारताकडून विहान मल्होत्रा आणि अरोन जॉर्ज यांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाला फायनलमध्ये पोहोचवले.
हेही वाचा : इशानच्या शतकाने इतिहास रचला; झारखंडने पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली
बांगलादेश व पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा दुसरा सामना खेळवला गेला. पावसामुळे हा सामना देखील २७ षटकांचा खेळवला गेला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २६.३ षटकांत सर्वबाद होत १२१ धावा केल्या. तर पाकिस्तानने २ बाद १२२ धावा करत सहज विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान असा थरार रंगणार आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील अंडर-१९ आशिया चषकाचा अंतिम सामना २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. या महामुकाबल्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





