..तर आयसीसीने माझे पाय धुवून पाणी प्यावं; शोएब अख्तरचं धक्कादायक वक्तव्य

Shoaib Akhtar | पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने २००३ च्या विश्वचषकादरम्यान सर्वात वेगवान गोलंदाजीचा विक्रम केला होता. या स्पर्धेदरम्यान त्याने इंग्लंडविरुद्ध १६१.३ किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकला. क्रिकेटच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू आहे. म्हणजेच गेल्या २१ वर्षांपासून हा विक्रम एकाही गोलंदाजाला मोडता आलेला नाही. याबाबत बोलताना शोएब अख्तरने एक धक्कादायक विधान केलं आहे.
शोएब अख्तर नुकताच TNKS Podcast मध्ये दिसला होता. या शोमध्ये त्याचा विचारण्यात आले की, त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम कोणी मोडू शकेल का? यावर तो म्हणाला, मला वाटतं असं होऊ शकतं. जर मी जगभरातून गोलंदाज गोळा केले तर हा विक्रम ६ महिन्यांत मोडता येईल असे मला वाटते.
हेही वाचा – पद्मश्री पुरस्कार विजेत्या भारतीय पर्यावरणतज्ज्ञ तुळशी गौड यांचे निधन
जगभरातून दोन-तीन हजार खेळाडू गोळा करण्यात मला यश आले तर मी माझा विक्रम मोडेन. युवा खेळाडू १६०-१७० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करू शकतात. जर तसं झालं नाही तर मी तुम्हाला १५०, १४० आणि १४५ किलोमीटर प्रतितास या वेगाने गोलंदाजी करणारे वेगवान गोलंदाज देईन. मग भारत-पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश त्यांना संधी देतात की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, असं तो म्हणाला.
खेळाडूंना खेळवण्यासाठी मी मतदान घेईन. लोक मतदान करतील आणि कोणाला खेळायला द्यायचे आणि कोणाला नाही हे चाहते सांगतील. कोणीतरी येऊन माझा विक्रम मोडावा अशी माझी इच्छा आहे. फक्त एक चेंडू टाकायचा आहे. जगाला १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकणारे गोलंदाज भारत, पाकिस्तान व बांगलादेशला मिळत असतील तर आयसीसीने माझे पाय धुवून पाणी प्यावं, असं धक्कादायक विधान शोएब अख्तर याने केलं आहे.





