भारतात खेळा अन्यथा…, आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळली

T20 World Cup 2026 Bangladesh Team: आगामी टी-20 विश्वचषकातील भारतातील आपले सर्व सामने श्रीलंकेत हलवावेत, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केली होती. मात्र बांगलादेशची ही मागणी आयसीसीने फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी पुरुष टी-20 विश्वचषकात सहभागी होण्यासाठी बांगलादेशच्या भारत दौऱ्याबाबत काल आयसीसी आणि बीसीबी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आयसीसीने बीसीबीला सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशचे सामने भारताबाहेर खेळवण्याची त्यांची विनंती फेटाळण्यात येत आहे. बांगलादेशला टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात प्रवास करावा लागेल, अन्यथा त्यांना गुण गमवावे लागतील, असा इशाराही आयसीसीने दिला आहे. दरम्यान, 7 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा – गोरेगावमध्ये 14 ते 16 जानेवारीदरम्यान वाहतूक निर्बंध लागू
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने गेल्या काही दिवसांआधी एक आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत भारतात होणाऱ्या सामन्यांदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्याची परिस्थिती आणि बांगलादेश सरकारकडून मिळालेल्या सल्ल्याचा विचार करता, सध्या भारतात दौरा करणे संघासाठी सुरक्षित नाही, असा निष्कर्ष बोर्डाने काढला. आधी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, बांगलादेशला कोलकातामध्ये तीन,तर मुंबईत एक सामना खेळायचा होता.
वेळापत्रकानुसार, बांग्लादेश 7 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. त्यानंतर 9 फेब्रुवारीला इटलीशी, तर 14 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध महत्त्वाचा सामना होणार आहे. हे तिन्ही सामने कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. याशिवाय, गट टप्प्यातील अखेरचा सामना बांगलादेशला नेपाळविरुद्ध मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळावा लागणार आहे.




