IPL 2026 प्लेऑफचे ३ संघ निश्चित, आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये ‘कांटे की टक्कर’!

IPL 2026 | आयपीएल २०२६ (IPL 2026) चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफचे समीकरण कमालीच्या रोमांचक वळणावर आले आहे. चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यानंतर प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या संघांचा आकडा आता ३ वर पोहोचला आहे. आता प्लेऑफची केवळ एकच जागा शिल्लक असून, त्यासाठी तब्बल ५ संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
यंदाच्या मोसमात बाद फेरीत धडक मारणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हा पहिला संघ ठरला आहे. आरसीबी सध्या सर्वाधिक १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. बंगळुरूनंतर गुजरात टायटन्स (GT) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांनीही प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. गुजरात आणि हैदराबाद या दोन्ही संघांचे सध्या समान १६ गुण आहेत, मात्र सरस नेट रन रेटच्या जोरावर गुजरात दुसऱ्या तर हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे.
एका जागेसाठी ५ दावेदार; पंजाबचे स्थान धोक्यात?
सध्या गुणतालिकेत पंजाब किंग्स १४ गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे. मात्र, पंजाब तिथेच टिकून राहणार की त्यांची घसरण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण एका जागेसाठी स्पर्धा करणाऱ्या ५ संघांमध्ये खालील समीकरणांचा समावेश आहे:
पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स: या तिन्ही संघांचा आता प्रत्येकी केवळ १-१ सामना बाकी आहे. त्यामुळे शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना आपला शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकणे अनिवार्य आहे.
हेही वाचा
देशभरात पेट्रोलचे-डिझेलचे दर पुन्हा वाढले, 5 दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स: या दोन्ही संघांचे प्रत्येकी २-२ सामने बाकी आहेत. कोलकाता (KKR) सध्या ११ गुणांसह आठव्या स्थानावर असला तरी ते अजूनही तांत्रिकदृष्ट्या शर्यतीत कायम आहेत.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्स (९ वे स्थान) आणि लखनौ सुपर जायंट्स (१० वे स्थान) हे दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडले आहेत. त्यांचे उर्वरित सामने आता केवळ औपचारिकता उरले आहेत.
आज (१९ मे) आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगणार आहे. लखनौ आधीच स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे राजस्थानसाठी ही मोठी संधी असेल. राजस्थान सध्या १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. आजचा (१३ वा) सामना जिंकल्यास राजस्थान थेट ‘टॉप-४’ मध्ये प्रवेश करेल. या विजयामुळे त्यांचे प्लेऑफमधील स्थान पूर्णपणे निश्चित होणार नसले तरी, त्यांच्या दावेदाराची बाजू नक्कीच मजबूत होईल. त्यामुळे आजच्या सामन्याच्या निकालावर इतर पाचही संघांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.





