भारताचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, गिलच्या नेतृत्त्वाखाली पहिला कसोटी मालिका विजय

IND vs WI | भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी निर्भेळ मालिका जिंकली आहे. या विजयासह शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा हा पहिलाच कसोटी मालिका विजय ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने पहिल्या डावात ५ विकेट्स गमावून ५१८ धावांचा भक्कम डोंगर उभारला. यशस्वी जैस्वालने १७५, शुबमन गिलने १२९ तर साई सुदर्शनने ८७ धावा करून भारतीय डावाला मजबुती दिली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात २४८ धावांवर सर्वबाद झाला, त्यानंतर फॉलोऑन मिळाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या डावात ३९० धावा केल्या.

हेही वाचा : जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण जाहीर
वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले, जे टीम इंडियाने केवळ ३ विकेट्स गमावून सहज पार केले. केएल राहुलने नाबाद ५८ धावांची खेळी करत चौकाराने भारताचा विजय निश्चित केला.
गोलंदाजीत कुलदीप यादव चमकला. त्याने एकूण ८ विकेट्स घेतल्या, तर जडेजा, बुमराह आणि सिराज यांनी मिळून ७ विकेट्स घेतल्या.
२००२ पासून वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. या कालावधीत भारताने लागोपाठ १० कसोटी मालिका आपल्या नावावर केल्या आहेत — जो एक ऐतिहासिक विक्रम आहे.
या विजयासह भारताने ३७८ दिवसांनी कसोटी मालिका जिंकण्याचा आनंद पुन्हा अनुभवला असून, अखेरचा विजय गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध नोंदवला होता.




