महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनास ‘बीसीसीआय’चा नकार

Women’s T20 World Cup 2024 | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) विचारणा केली होती. मात्र, आपण हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी सांगितले.
जय शहा म्हणाले, महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आयोजन करण्याबाबत ‘आयसीसीआय’ला विचारणा केली. मात्र, मी स्पष्ट नकार दिला. आपल्याकडे त्या काळात (ऑक्टोबर) मान्सून सुरू असेल. तसेच पुढील वर्षी महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही भारतात होणार आहे. त्यामुळे सलग दोन विश्वचषकांचे आयोजन करण्यास मी उत्सुक नव्हतो.
हेही वाचा – आगामी निवडणुकीनंतर सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवार म्हणाले..
आपल्याकडे दिवस-रात्र कसोटी सामना दोन दिवसांतच संपतो. त्यामुळे प्रेक्षक, प्रसारणकर्ते यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. आम्हाला या गोष्टींचाही विचार करावा लागतो, असंही जय शहा म्हणाले.
महिलांची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशात नियोजित आहे. मात्र, बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे महिला ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परिस्थिती चिंताजनक आहे आणि आयसीसी देखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर परिस्थिती लवकर सुधारली नाही तर आयसीसी या प्रकरणी मोठा निर्णय घेऊ शकते.





