अबब! भाजी विक्रेत्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले तब्बल १७२ कोटी
![172 crores in the bank account of Abab, a vegetable seller.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Farmer-780x470.png)
गाजीपूरः गाझीपूर येथील एका भाजी विक्रेत्याला १७२.८१ कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी इन्कम टॅक्स रिटर्नन न भरल्यामुळे आयकर विभागाने नोटिस जारी केली आहे. विनोद रस्तोगी असं या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. आयकर विभागाच्या नोटिसबाबत व बँक खात्यातील रक्कमेबाबत त्याला काहीच ठावूक नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. तसंच, कोणीतरी त्याची कागदपत्रे वापरुन बँक खाते उघडल्याचा दावा त्याने केला आहे.
विनोद रस्तोगी यासा आयकर विभागाच्या वाराणसी कार्यालयातून नोटिस पाठवण्यात आली आहे. नोटिशीमध्ये म्हटल्यानुसार, युनियन बँकेत त्यांच्या नावे असलेल्या खात्यात १७२. ८ कोटी इतकी रक्कम आहे. त्यावर त्यांनी अद्याप टॅक्स भरलेला नाहीये, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. नोटिस मिळाल्यानंतर रस्तोगी आयकर विभागाच्या कार्यालयात पोहोचले व तिथून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्कादायक गोष्टी समजल्या. आयकर विभागाने पाठवलेल्या नोटिशीत जे बँक खाते नमूद केलं आहे. ते त्यांचे नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच, या आधी कधीच इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार केला नाहीये, असंही त्यांनी म्हटलं आहे. कोणीतरी त्यांच्या कागदपत्राचा दुरुपयोग करुन बँक खाते खोलले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
रस्तोगी यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी याप्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करु, असं आश्वासन दिलं आहे. २६ फेब्रुवारी रोजी रस्तोगी यांना आयकर विभागाकडून नोटिस आली होती. यात तुमच्या बँक खात्यात इतकी मोठी रक्कम कशी आली आणि इनमक सोर्स काय आहे?, याचा खुलासा करण्यासं सांगितले होते. नोटिस मिळताच रस्तोगी यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. तिथे त्यांचे कागदपत्रे तपासण्यात आले आहेत. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वीदेखील रस्तोगी यांना अशाच प्रकारची एक नोटिस आली होती, अशी चर्चा आहे.
आयकर विभाग आणि सायबर पोलिस संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. रस्तोगी यांना काही कागदपत्रे आणून देण्यास सांगितले आहेत. त्यांना याआधीही अशी नोटिस मिळाली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, असं सायबर सेलचे प्रभारी वैभव मिश्रा यांनी म्हटलं आहे. तर, एकीकडे गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, या सगळ्या प्रकाराचा घाबरुन रस्तोगी आपल्या घराला टाळे लावून कुटुंबासोबत अज्ञात ठिकाणी निघून गेले आहेत.