शेती व ग्रामीण जीवनाशी नाळ कायम राहिली तरच समाजाला भविष्य : प्रवीण तरडे
इर्जिक फाउंडेशनच्या पहिल्या मानांकित विक्री केंद्राचे उद्घाटन
पुणे : शेती, शेतकरी आणि ग्रामीण जीवनाशी नाळ जोडलेली राहिली तरच समाजाला भविष्य आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक या तिन्ही घटकांना एका सूत्रामध्ये बांधणाऱ्या इर्जिक फाउंडेशनचे काम समाजासाठी गरजेचे आणि कौतुकास्पद आहे, असे उद्गार प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी काढले.
रास्त भाव, शाश्वत दर्जा आणि नियमित पुरवठा या त्रिसूत्रीवर आधारित विक्री व्यवस्था पुणे, मुंबई आणि नाशिक येथे इर्जिक फाउंडेशनने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सूस येथील गणेश सुपर मार्केट या इर्जिक मानांकित विक्री केंद्राचे लोकार्पण तरडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, भारतीय किसान संघाचे चंदन पाटील आणि इर्जिक फाउंडेशनचे संचालक किशोर निर्मल, अजित फाटके, देवानंद लोंढे, निवृत्त कमांडर जयंत कोंदे, महाव्यवस्थापक गिरीश निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांनी दर्जेदार मालाचे उत्पादन करावी त्यावर प्रक्रिया करावी असे आवाहन करतानाच माझ्या आगामी चित्रपटांमध्ये मी हा विषय आवर्जून मांडणार आहे, असे प्रवीण तरडे म्हणाले.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना शेती क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून एकत्र येण्यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली. आपल्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये केलेल्या यशस्वी प्रयोगांचा त्यांनी उल्लेख केला शासनाच्या योजना आणि अधिकारी हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताची निर्णय घेत असतात, त्यामुळे शासन आणि शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद राहण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
याप्रसंगी प्रतीकात्मक स्वरूपात शेतकरी उत्पादक निरंजन अनेगिरिकर, विक्रेते संतोष सुतार आणि ग्राहक सुजाता मोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. डॉ. भारत करडक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर फाउंडेशनचे संचालक किशोर निर्मळ यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पुण्यात 50 दुकानांना ईर्जिक मानांकित करण्याचे नियोजन…
सध्या ईर्जिकसोबत 4 शेतकरी उत्पादक कंपनी काम करत आहेत. शेतकऱ्यांसोबतच ग्रामीण कारागीर, हस्त कलाकार उदा. चर्मकार, कुंभार, बांबू कारागीर इ. यांनाही सर्व प्रकारची मदत व त्यांच्या शाश्वत उपजिविकेची हमी इर्जिकमध्ये असणार आहे. पुणे शहरात एकूण ५० दुकांनाना ईर्जिक मानांकित करण्याचे नियोजन आहे. तसेच, अधिकाधिक घरी वस्तू पोहोच मिळण्याची व्यवस्था होणार आहे. मोबाईल व इंटरनेट द्वारे वस्तू नोंदणी व खरेदी, विक्रीसाठी वस्तूंची नोंदणी तसेच सेवांची नोंदणी उदा. वाहतूक व्यवस्था या व्यवस्था प्रारंभ होत आहेत, अशी माहिती महाव्यवस्थापक गिरीश निंबाळकर यांनी दिली.