सीताफळ उत्पादन निम्म्यावर
पुणे : यंदाच्या विपरीत पावसाचा एकत्रित परिणाम म्हणून सीताफळ उत्पादन निम्म्यावर आले असून दर्जाही घसरला आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंत चांगला दर मिळाला पण अपेक्षित उत्पादनाअभावी शेतकऱ्यांची मात्र मोठी निराशा झाली. करोनामुळे मागील दोन हंगाम आणि पावसामुळे यंदाचा, म्हणजे सलग तीन हंगाम वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, असे सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांनी सांगितले.
गट्टाणी म्हणाले, की राज्यभरात सुमारे एक लाख हेक्टरवर सीताफळाच्या बागा आहेत. डोंगर-दऱ्या, नदी, ओढय़ांच्या काठावर, शेत जमिनीच्या बांधांवरील सीताफळांच्या झाडांची मोजणी होत नाही, त्याचा विचार करता मोजणी न झालेले क्षेत्रही एक लाख हेक्टरवर असेल. दरवर्षी सुमारे आठ हजार हेक्टरने सीताफळाच्या लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. साधारणपणे दिवाळीच्या काळात बाजारपेठेत मोठी आवक असते. पण, यंदा बाजारातही फारशी आवक झाली नाही.
गोडवा हरवला..
सततच्या पावसामुळे सीताफळांमध्ये यंदा अपेक्षित गोडवा भरला नाही. त्यामुळे दर्जा घसरला. माळरानावर, खडकाळ जमिनीवरील झाडांना फळे चांगली आली, पण कसदार जमिनीतील झाडांना फळधारणाच झाली नाही. त्यामुळे उत्पादन जेमतेम ५० टक्केच झाले.
पल्प उद्योगाची अडचण..
सीताफळावर प्रक्रिया करणारे राज्यात सुमारे ७० प्रकल्प आहेत. लहान, पिकलेल्या सीताफळांचा वापर पल्प तयार करण्यासाठी केला जातो. पल्पसाठीच्या सीताफळांना यंदा १८० ते २०० रुपये प्रति किलो इतका चांगला दर मिळूनही या उद्योगाला अपेक्षित पुरवठा होऊ शकला नाही, अशी माहिती सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांनी दिली.
काय घडले?
सीताफळांना फुले येण्याच्या काळात जुलै-ऑगस्टमध्ये राज्यात सर्वदूर अतिवृष्टी, संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे झाडांना कळय़ा कमी आल्या आणि आलेल्या गळून पडल्या. फळाच्या वाढीच्या अवस्थेतही पाऊस होता. झाडाची मुळे सतत पाण्यात राहिल्यामुळे फळे मोठी झाली नाहीत. अनेक ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव झाला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे २५ टक्के अधिक दर मिळाला. पण, उत्पादन जेमतेम ५० टक्केच झाले. त्यामुळे वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही.
– श्याम गट्टाणी, अध्यक्ष, सीताफळ महासंघ