वॉटर टॅक्सीसेवेला अल्प प्रतिसाद
मुंबई | नवी मुंबई आणि मुंबई यांना जोडणाऱ्या ‘वॉटर टॅक्सी’सेवेला वाजतगाजत सुरुवात झाली खरी, पण उद्घाटनानंतर दहा दिवसांत स्पीड बोटीच्या केवळ तीनच फेऱ्या झाल्या आहेत, तर कॅटमरानची प्रवाशांअभावी एकही फेरी झालेली नाही.
या ‘वॉटर टॅक्सी’ सेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले होते. बेलापूर आणि मुंबईतील भाऊचा धक्का या दरम्यान ही ‘वॉटर टॅक्सी’ सेवा चालवण्यात येते. रस्तामार्गे या प्रवासाला ९० मिनिटे लागतात, ‘वॉटर टॅक्सी’सेवेमुळे वेळ कमी होऊन २५ मिनिटांवर येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ‘वॉटर टॅक्सी’ सेवेला मिळालेल्या अल्पप्रतिसादाबाबत महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की या सेवेबाबत सर्व संबंधितांची बैठक २ मार्चला घेण्यात येणार असून तीत या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. भाऊचा धक्का ते दक्षिण मुंबईतील मुख्य ठिकाणांना जोडणाऱ्या सेवेचा प्रश्न असून भाऊचा धक्का येथून वाहतूक सेवा पुरवण्याची गरज काही प्रवाशांनी लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे त्यावर विचार करीत आहोत, असेही सैनी यांनी स्पष्ट केले.