#CoronaVirus : राज्यातील सरकारी कार्यालये आठ दिवसासाठी राहणार बंद
मुंबई | महाईन्यूज
करोना विषाणुला थोपवण्यासाठी महाराष्ट्राची लॉक डाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. खाजगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात घेण्यात आला.
करोनाचे महाराष्ट्रात ३९ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजना लागू केल्या जात आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनानं सुरूवातीच्या टप्प्यात शाळा, महाविद्यालयांना सुटी, चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स यासह गर्दी होणाऱ्या संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले. मुंबईत गर्दीला आवर घालण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केला. मात्र, करोनाचा संसर्ग थोपवण्यात राज्य सरकारला अपेक्षित यश आलेलं नाही.
सध्या महाराष्ट्रात करोना दुसऱ्या टप्प्यात असून, लॉक डाऊनच्या दिशेनं सरकारनं पाऊलं टाकली आहेत. भारतीय रेल्वेनं लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. तर मुंबईतील लोकल आणि मेट्रो सेवा बंद ठेवण्याचाही विचार राज्य सरकार करत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत शासकीय कार्यालयांना एक आठवडा सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी देण्याचा विचार सरकारकडून सुरू होता. या काळात नागरिकांना ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.