धक्कादायक! चार महिन्यांपूर्वी लग्न, सासरहून हुंड्यासाठी छळ, वधुची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
औरंगाबाद: लग्नाला चार महिने होत नाही तर एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबादेतील कंचनवाडी भागात घडली. तापासा अंती पतीसह सासू सासरा असे तिघाविरोधात हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
अश्विनी कुणाल देहाडे (वय १९) असे मृत विवाहितेचं नाव आहे. तर कुणाल विक्रम देहाडे ( वय २०, रा. फ्लॅट क्र. २१, सैनिक विहार अपार्टमेंट, वाल्मी नाका, कांचनवाडी) असे अटकेतील पतीचे नाव आहे. सासरा विक्रम देहाडे आणि सासू माया देहाडे दोघेही फरार आहेत.
चार महिन्यांपूर्वी लग्न
अश्विनीचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. सुरुवातीला दोन महिने सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर घर घेण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावण्यात आला. यावरून सतत वाद होत असल्याने मंगळवारी अश्विनीचे वडील घरी आले होते. दोन्ही कुटुंब चर्चा करीत असताना अश्विनीने बेडरूमच्या दरवाजा आतून बंद करून गॅलरीतून उडी घेतली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीला अटक करण्यात आली आहे.