शिवसेना खासदार भावना गवळींना ED कडून समन्स
मुंबई |
वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. येत्या सोमवारी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी रात्री (२७ सप्टेंबर) भावना गवळी यांचे निकटवर्तीय आणि सहकारी सईद खान यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तर,आज (२९ सप्टेंबर) भावना गवळी यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. शिवसेनेसाठी आता हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचं कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांना ईडीकडून नुकतीच अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा खान यांचे वकील इंद्रापल सिंह यांनी केला आहे. दरम्यान, सईद खान यांच्या अटकेनंतर भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाल्याच्या चर्चा सुरु असतानाच ईडीकडून त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- नेमका प्रकरण काय?
वाशीम जिल्हय़ातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. गवळींनी ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाख रुपयात घेतला आहे. सन २०१९ मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. ७ जुलै २०१९ रोजीच्या चोरीची तक्रार १२ मे २०२० रोजी करण्यात आली. १० महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय?, त्या कार्यालयात ७ कोटी कुठून आले? असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को- ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी केल्या आहेत.