शिवसेना नेत्या दिपाली सय्यद या सातत्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांवर टीका
मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद या सातत्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांवर टीका करत आहेत. दिपाली सय्यद यांनी एक ट्विट करुन मनसेला पुन्हा एकदा डिवचलं आहे. मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती असल्याची टीका दिपाली सय्यद यांनी केली आहे. मनसेनं यापूर्वी बनवलेल्या शॅडो कॅबिनेटच्या मुद्यावरुन देखील सय्यद यांनी टीका केली आहे. मनसेचा अयोध्या दौरा आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मुद्यावर देखील सय्यद यांनी मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
दिपाली सय्यद यांची मनसेवर पुन्हा टीका
दिपाली सय्यद यांनी मनसेवर सातत्यानं टीका केली आहे. मनसेच्या नेत्यांकडून देखील दिपाली सय्यद यांना प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी ठाकरेंच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री व्हायला आवडेल, असं म्हटलं होतं. त्यानंतर विविध चर्चांना सुरुवात झाली होती. दिपाली सय्यद यांनी याच मुद्याचा आधार घेत मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती ल्याची टीका केली. अमित ठाकरे म्हणजे कार्यकर्त्यांना सोडून घरी बसलेले गृहमंत्री असल्याची टीका दिपाली सय्यद यांनी केली.
शॅडो कॅबिनेटवरुनही टीकास्त्र
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारच्या कामावर लक्ष असावं, म्हणून मनसेकडून शॅडो कॅबिनेट निर्माण करत विविध नेत्यांवर जबाबदारी दिली होती. दिपाली सय्यद यांनी मनसेला या मुद्यावरुन देखील डिवचलं आहे. शॅडो कॅबिनेटने अयोध्येला जाता येत नसते रे, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. तुम्ही गृहमंत्री तर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह तुमचे संरक्षण मंत्री आहेत का, असा सवाल दिपाली सय्यद यांनी केला.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं, सय्यद यांची भूमिका
गेल्या महिनाभरापासून शिवसेनेतील सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत सेनेच्या ४० आमदारांनी भाजपसोबत राज्य सरकार स्थापन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्या प्रकरणी बंडखोरांवर कारवाईचं सत्र सुरु ठेवलं आहे. दिपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावी, अशी भूमिका घेतली आहे. दोन्ही बाजूच्या आमदार खासदारांनी प्रयत्न केले तर अशक्य काहीच नाही, वेळेच्या आगोदर आणि वेळेच्या नंतर काहीच नाही जे आहे ते वेळेवर अजूनही वेळ गेलेली नाही, राग रूसवे विसरून कुटूंब वाचवा! चर्चा तर झालीच पाहिजे, अशी भूमिका दिपाली सय्यद यांनी घेतली होती.