Uncategorized

शिंदे – फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, भाजपाकडून शिवरायांचा अपमानः राऊतांची मागणी

मुंबई । महाईन्यूज ।

शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर मुख्यमंत्र्यांनी या सरकारमधून राजीनामा द्यावा. कारण हा भाजपने केलेला अपमान आहे. मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्र्यांनी या अपमानानंतर ताबडतोब राजीनामा द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज सकाळी ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अतिशय दळभद्री विधान केलं आहे. त्यांच्या विधानामुळे महाराष्ट्रांचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला आहे. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी नॅशनल चॅनेलवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली असं विधान केलं आहे. वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले यांचा अपमान करायचा, छत्रपती संभाजी महाजारांचा अपमान करायचा, ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी कधी मागितली? हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे. कारण ते भाजपचे आता सहयोगी आहेत. ते मुख्यमंत्री आहेत.

हे जोडे राष्ट्रीय प्रवक्त्यांना, राज्यपालांना मारणार आहात का?
वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून ते रस्त्यावर उतरलात स्वागत आहे, जोडे मारले स्वागत आहे, आता हे जोडे तुम्ही कोणाला मारणार आहात, हे जोडे राष्ट्रीय प्रवक्त्यांना मारणार आहात की राज्यपालांना मारणार आहात? असा संतप्त सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

ज्यांनी महाराष्ट्राचं स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा अशाप्रकारे घोर अपमान केला. छत्रपतींनी माफी मागितली मग पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन त्यांचा जयजयकार का करतात? असा सवाल करत इंडियन नेव्हीला त्यांनी शिवाजी महाराजांच्या नव सेनेचे बोधचिन्ह दिलं ते कशा करता दिलं? औरंगजेबाच्या, अफजल खानाच्या कबरी तोडण्याची नाटकं कशासाठी करताय? असे अनेक सवाल राऊतांनी उपस्थित केले.

स्वाभिमानासाठी भाजपसोबत गेलेल्यांचा स्वाभिमान आता कुठे गेला?
स्वाभिमानाचं तुनतुनं वाजवत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली, स्वाभिमानासाठी ते भाजपसोबत गेले, आता कुठे गेला त्यांचा स्वाभिमान? 72 तास झाले शिवाजी महाराजांचा अपमान करून, तरीही राज्याचा मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या 40 लोकांनी यावर साधा निषेध केला नाही, इतके घाबरत आहे? शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर मुख्यमंत्र्यांनी या सरकारमधून राजीनामा द्यायला पाहिजे होता. कारण हा भाजपने केलेला अपमान आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी या अपमानानंतर ताबडतोब राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय
आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो म्हणून तुमचा स्वाभिमान दुखावला आणि तुम्ही पक्ष सोडला, मात्र इथे तर भाजप आणि त्यांच्या राज्यपालाने अधिकृत छत्रपतींचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं तरी ते सत्तेला चिकटून बसले आहेत. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय, अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button