अजित पवारांच्या टीकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
पुणे : कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांचा राजीनामा आणि त्यानंतरच्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं. दरम्यान, यावरून शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, कुणी पक्ष सोडून गेलं असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. शेवटी जनतेत जे भूमिका मांडून पाठिंबा घेण्यासाठी यशस्वी होतात, जनताही त्यांच्याबरोबर राहते. तेच महाराष्ट्रात पाहायला मिळेल. महाराष्ट्राच नवीन लोकांना संधी देण्याची वेळ आली आहे. ही युवकांची संघटना मजबूत करू शकलो, तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एक फळी मोठ्या मतांनी निवडून येईल.
हेही वाचा – ‘रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ’; सुजय विखेंचा रोख नेमका कोणाकडे?
काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले, टीका-टिप्पणी केली. बाहेर पडलेल्यांनी पक्ष नेण्याचा प्रयत्न केला. पण, खूप विचार करण्याची गरज नाही. जनता प्रश्न विचारेल म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी टीका केली जाते. सत्ता येते, जाते. मात्र, जनता तुम्ही कुठून निवडून आला, तुमचं पक्षचिन्ह, तुमचा कार्यक्रम याचा विचार करते. त्यामुळे जागरूक जनता महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत परिवर्तन करण्याची धमक समाजात असते. परिवर्तनाचा कार्यक्रम घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे, असं शरद पवार म्हणाले.
तीन-चार महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे. पक्षानं ठरवलेला मतदारसंघ निवडून आणण्यासाठी पुढील पावले टाकली पाहिजेत, असंही शरद पवार म्हणाले.