मनोज जरांगेंना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देणार? शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
मुंबई | मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांच्या पाठिंब्यानेच आंदोलन करत आहेत. तसेच शरद पवारांचा पक्ष जरांगेंना लोकसभेची उमेदवारी देणार आहे, असा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी दावा केला आहे. भाजपाच्या या आरोपांना शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनोज जरांगे यांना बीडमधून उमेदवारी देणार आहे का? यावर शरद पवार म्हणाले, आता आमच्यावर अशी वेळ आली आहे का? हा दावा कोणी केलाय? या प्रश्नावर सर्वांनी आशिष देशमुख असं उत्तर दिलं. देशमुखांचं नाव ऐकून पवार म्हणाले, हे खूप मर्यादित लोक आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलायचं, असं ते म्हणाले.
हेही वाचा – जय शाहने कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का? संजय राऊतांचा शाहांना खोचक टोला
आशिष देशमुख नेमकं काय म्हणाले?
शरद पवार गट बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय महत्त्वकांक्षा होती, म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन उभं केलं आणि एवढे महिने लांबवलं. आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून पवार गट प्रयत्न करेल. ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल, असं आशिष देशमुख म्हणाले.