राजीनामा मागे घेण्याच्या मागणीवर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले,..
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, राजीनामा देण्याआधी मी तुमच्याशी चर्चा केली असती, तर मला खात्री होती की तुम्ही मला होय म्हणाले नसता. हा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राज्याबाहेरील लोकांबरोबर उद्या बैठक होईल. त्यानंतर एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय सांगू. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही.
मी निर्णय घेण्याआधी सहकाऱ्यांशी चर्चा करणं आवश्यक असतं, पण मला खात्री होती तुम्ही मला होय म्हणाले नसता. तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायची आवश्यकता होती, पण त्यावेळी मी तुम्हाला विश्वासात घेतलं नाही. त्यामागे माझा हेतू काय होता? हे मी तुम्हाला सांगितलं आहे, असं शरद पवार म्हणाले.
मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राबाहेरून तुमचे अनेक सहकारी इथे आले आहेत. उद्या माझ्याशी त्यांना बोलायचंय. उद्या संध्याकाळपर्यंत माझी त्यांच्याबरोबर बैठक होईल. त्यानंतर तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरून आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन..येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम भूमिका घेऊ. पण ती भूमिका घेताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, एवढंच याठिकाणी सांगतो. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, याची खात्री देतो, असंही शरद पवार म्हणाले.